![]()
देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी या अत्यंत गर्दीच्या ठिकाणांवर छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने मुंबईत एकूण चार ठिकाणी छापे टाकले. यामध्ये गोवंडीतील तीन आणि कुर्ल्यातील एका ठिकाणाचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मोबाईल, लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त दहशतवादी संघटनेच्या कथित ऑनलाइन प्रचारासंदर्भात ही छापेमारी करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी सुरू झालेली ही मोहीम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होती. या शोधमोहिमेत एटीएसने मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अनेक महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. अनेक संशयितांची सध्या कसून चौकशी केली जात आहे. ISIS शी कनेक्शन असल्याचा संशय काही व्यक्ती डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून कट्टरपंथी विचारांचा प्रसार करत असल्याचे इनपुट्स केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळाले होते. विशेषतः एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सद्वारे ‘आयसिस’ (ISIS) या प्रतिबंधित संघटनेची विचारसरणी पसरवली जात असल्याचा संशय आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांचे या संघटनेशी संबंध असल्याचे सबळ पुरावे एटीएसच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपासाची व्याप्ती वाढणार हे संशयित केवळ कट्टरपंथी सामग्री पाहत होते की नवीन तरुणांची भरती करण्याच्या मोहिमेत सक्रिय होते, याचा शोध सध्या घेतला जात आहे. या प्रकरणाचे कनेक्शन थेट परदेशातील हँडलर्सशी असण्याची शक्यता आहे. एटीएसने अद्याप अधिकृत अटक जाहीर केली नसली तरी, आगामी काळात मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारची मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गोवंडीत 3 तर कुर्ल्यात 1 ठिकाणी एटीएसची छापेमारी:4 संशयित ताब्यात, दहशतवादी कनेक्शनचा संशय
