![]()
इराणवर अमेरिका आणि इराकसह इतर देशांनी केलेल्या हल्ल्यांच्या आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू असलेल्या प्रतिहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, आखाती देशांमध्ये असलेले अमरावती जिल्ह्यातील नागरिक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाकडून त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी देशपातळीवर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. तसेच, राज्य सरकारनेही याबाबत ‘एसओपी’ (Standard Operating Procedure) जाहीर केली आहे. याच धर्तीवर अमरावती जिल्हा प्रशासनानेही हेल्पलाइन जारी केली असून, जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून माहिती मागवण्यात आली आहे. सध्या काही तालुक्यांतून, विशेषतः अमरावतीतून मिळालेल्या माहितीनुसार, काही नागरिक सहलीसाठी तर काही जण पवित्र हज यात्रेसाठी आखाती देशांमध्ये गेले आहेत. ते सध्या ज्या ठिकाणी आहेत, तेथे सुखरूप असून जिल्हा प्रशासनासह आपापल्या नातेवाईकांच्या संपर्कात आहेत. त्यांना काही अडचणी असल्यास शासनातर्फे त्या सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. मात्र, अशा नागरिकांची नेमकी संख्या किती आहे, हे जिल्हा प्रशासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
आखाती देशातील अमरावतीकर सुखरूप:जिल्हा प्रशासनाकडून मोजदाद सुरू, हेल्पलाइन जारी
