अजितदादांचा घात डिजिसीएने जाणीवपूर्वक घडवून आणला का?:अमोल मिटकरी आक्रमक; अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी




झारखंडच्या छपरामध्ये झालेल्या अपघातानंतर एआयबीने संबंधित कंपनीच्या कार्यालयावर तात्काळ छापा टाकत चौकशी सुरू केली. मग व्हीएसआर (VSR) प्रकरणात तशीच तत्परता का दिसून येत नाही, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या प्रकरणात केवळ थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा प्रयत्न असेल, तर महाराष्ट्रातील जनतेचा रोष आणखी वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला. अपघातानंतर एक महिन्याने अहवाल देण्यात आला, तर ब्लॅक बॉक्स तीन आठवड्यांनंतर सापडला. सुमित कपूर संदर्भात डिजिसीएने एक शब्दही उच्चारला नाही, अशी टीका त्यांनी केली. या कारवाईवर आम्ही समाधानी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे. व्हीएसआर व्हेंचअर्सला मोठा धक्का बसला असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांनी कंपनीच्या चार लिअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. अपघातानंतर या विमानांचे विशेष ऑडिट करण्यात आले होते. त्यामध्ये काही गंभीर उणिवा आढळल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व विमानांचे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही कारवाई उशिरा झाल्याचा आरोप करत मिटकरी यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. मिटकरी यांनी या प्रकरणात केवळ कंपनीवर कारवाई करून थांबू नये, तर डिजिसीएच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी केली. परवानगीशिवाय विमान उड्डाण करू शकत नाही, मग त्या दिवशी नारदुरुस्त विमान उड्डाणासाठी कसे देण्यात आले? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नियुक्त पायलट साहिल मदन आणि सहपायलट यश हे सध्या कुठे आहेत, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. कंपनीची विमाने दुरुस्त नव्हती, हे आता मान्य करण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, व्हीएसआर कंपनीवर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी मागणीही मिटकरी यांनी केली. सुमित कपूर यांच्याबाबत गंभीर शंका उपस्थित करत त्यांनी या प्रकरणात कंपनी आणि डिजिसीएने स्पष्ट उत्तर द्यावे, असे म्हटले. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेचा संताप वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला. गावपातळीवर वातावरण तापत असल्याचा दावा करत, डिजिसीए फक्त भुलथापा देत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. बाह्य गुप्तचर यंत्रणेमार्फत स्वतंत्र चौकशी याचबरोबर, डिजिसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला का, असा थेट आरोपही मिटकरी यांनी केला. बाह्य गुप्तचर यंत्रणेमार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला. अपघातासंदर्भात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे सांगत, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. व्हीएसआर आणि डिजिसीए दोघांनीही जनतेसमोर संपूर्ण सत्य मांडले पाहिजे, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *