आता थांबणार नाही ‘हा’ हल्ला! भोपाळपासून यवतमाळपर्यंत सत्तेचा पाया हादरवणारा राहुल यांचा ‘बिदाई’ सपाटा
काल भोपाळमधील किसान महापंचायत हा केवळ एक मेळावा नव्हा, तर तो गेल्या अनेक वर्षांपासून दडपल्या गेलेल्या शेतकरी वर्गाच्या आक्रोशाचा प्रतिध्वनी होता. विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी या व्यासपीठावरून केलेले भाषण हे निव्वळ भाषण नसून, सत्ताधाऱ्यांच्या जळमटाळलेल्या मानसिकतेवर केलेला आघात होता. पुढील महिन्यात महाराष्ट्रातील यवतमाळमध्येही हीच महापंचायत होणार आहे, याचा अर्थ असा की ही मोहीम आता थांबणार नाही.
भोपाळमध्ये बोलताना राहुल गांधी दिसले, ते पाहून एकच वाटतं की, शेवटी तो बदल घडून आला! याच आक्रमकतेची, याच ठाम भूमिकेची गरज होती. आता हे रूप घेऊन ते समोर आले आहेत, यातच नवीन राजकीय समीकरणांची चाहूल लागते. राहुल गांधी यांच्या बदलेल्या भूमिकेचे विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही; कारण वाचकांना, जनतेला हा बदल प्रत्यक्ष जाणवतोय.

या महापंचायतीत राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही वाचवू शकणार नाही. बिदाईची घडी आली आहे, असे सांगताना त्यांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. आपली छवी वाचवण्यासाठी, आपले राजकीय भविष्य वाचवण्यासाठी, पंतप्रधानांनी भारताचे हित अमेरिकेला विकले आहे. त्यांच्या मते, यानंतरही मोदी वाचू शकणार नाहीत, कारण आता त्यांना वाचवणारी कोणतीही शक्ती शिल्लक राहिलेली नाही.
लोकसभेत बोलू न दिले गेलेले राहुल गांधी आज एप्स्टीन फाइल्स, अमेरिकेशी झालेले व्यापार करार आणि जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील खुलासे यावर जोरदार प्रहार करत आहेत. ही केवळ टीका नसून, एक प्रकारची राजकीय जबाबदारीची जाणीव आहे. राहुल गांधींचा व्हिडिओ, जो कोट्यवधी लोकांनी पाहिला, त्यातील लाज कोणाला वाटली पाहिजे हा मुद्दा त्यांनी भोपाळमध्ये पुन्हा एकदा तडाख्यात मांडला. याउलट, मेरठमधील भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेसवर केलेला हल्ला, त्यांच्या खालच्या स्तराच्या भाषेचा परिचय देणारा होता. त्यामागे इंडिया आघाडीत फूट पाडण्याचा घाणेरडा डाव होता, हे उघड झाले आहे.
भोपाळमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधानांचीच भाषा त्यांच्यावर उलटवली. अमेरिकेसोबतचा व्यापार करार कॅबिनेटलाही न विचारता झाला. राजनाथ सिंग, शिवराज सिंह चव्हाण, नितीन गडकरी यांसारख्या मंत्र्यांनाही या डीलबद्दल माहिती नव्हती, असे सांगताना राहुल गांधी यांनी ‘राजनाथ सिंग जी’, ‘गडकरी जी’ असा आदरपूर्वक उल्लेख केला. यावरून दोन्ही नेत्यांच्या भाषेतील स्तराची तुलना सहज होते. राहुल गांधी यांनी खुल्या आव्हानात सांगितले की, तुमच्यात दम असेल तर हा व्यापार करार रद्द करून दाखवा. पण तुम्ही ते करू शकत नाही, कारण ट्रम्प यांचा दबाव आहे आणि अडाणी यांच्या अमेरिकेतील फौजदारी प्रकरणाची तलवार तुमच्यावर लटकतेय. भारताचा डेटा, शेतकऱ्यांचे भवितव्य यावरच संकट आले आहे, हे त्यांनी सत्य उघड केले.
राहुल गांधी यांच्या या नव्या शैलीला केवळ काँग्रेसच नव्हे, तर आता सामान्य जनताही प्रतिसाद देत आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ट्वीट करून केलेली टीका असो की हार्दिक पुरी यांच्यावरील डॉलर्स घोटाळ्याची चर्चा असो, जनता आता सजग झाली आहे. राहुल गांधींच्या भाषणाला दीड अब्ज लोकांनी पाहिले आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्या, याचा अर्थ एकच – देशातील वास्तव जनतेला कळत आहे.

समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनीही राहुल गांधींच्या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, भाजपच्या लहान नेत्यांशिवाय कोणी मोठा नेता राहुल गांधींना उत्तर देत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंगापूरमध्ये जाऊन नऊ वर्षांपूर्वीचे वातावरण सांगतात; ही भारताची बदनामी नव्हे का? राहुल गांधी परदेशात संवैधानिक संकटाचा मुद्दा उपस्थित करतात तो देशद्रोह, तर योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य कोणत्या कोटीत मोडेल? प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आली की, सत्ताधाऱ्यांची भाषा शेवटच्या स्तराला जाऊन भिडते. पण आता हे सहजासहजी चालणार नाही, हे राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेने स्पष्ट केले आहे.
