मालेगावात 4600 बांगलादेशी घुसल्याचा सोमैयांचा आरोप:काँग्रेसची नाशिक पोलिसांकडे तातडीने खुलासा करण्याची मागणी




मालेगाव येथे भाजप नेते किरीट सोमैया यांनी ४,६०० बांगलादेशी अतिरेकी घुसल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नाशिक जिल्हा पोलीस प्रशासनाकडे तातडीने खुलासा करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेश वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. सोमैया यांनी माध्यमांसमोर केलेल्या या गंभीर आरोपांची सत्यता सिद्ध करावी, असे आव्हान तिवारी यांनी दिले. तिवारी यांनी प्रश्न उपस्थित केला की, सोमैया मालेगाव येथे जाऊन अतिरेक्यांच्या कथित केंद्रांबाबत संख्येसह माहिती देत आहेत. मात्र, ही माहिती त्यांनी संबंधित पोलीस प्रशासनाला आधी का दिली नाही? जर त्यांच्याकडे इतकी ठोस माहिती होती, तर ती जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना का कळवली नाही, असेही तिवारी म्हणाले. काँग्रेसने असाही आरोप केला आहे की, काही वृत्तवाहिन्यांवर सोमैयांच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून रोखल्याचे दिसून आले. त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे तिवारी यांनी नमूद केले. जिल्हा प्रशासनाने या आरोपांची सत्यता तातडीने जाहीर करावी, अशी मागणी तिवारी यांनी केली. तसेच, संबंधित माहिती पोलिसांना न देता ती जाहीरपणे मांडल्याबद्दल सोमैयांची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा, सामाजिक सलोखा आणि शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *