Mumbai BJP Rebel Candidates Pacification; Municipal Elections Statement By Chandrashekhar Bawankule | भाजपकडून नाराज बंडखोरांची मनधरणी: सर्वच बंडखोर आपली उमेदवारी मागे घेतील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास – Maharashtra News



मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकीत भाजपच्या ज्या नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, ते सर्वजण लवकरच आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा ठाम विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला

.

मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. त्यात सर्वच पक्षांमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. विशेषतः सत्ताधारी भाजपमध्ये जागा कमी व इच्छुकांचा भरणा जास्त असल्यामुळे बंडखोरी वाढली आहे. त्यातच भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना संधी देण्यात आल्यामुळे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नाशिक आदी ठिकाणी मोठी बंडखोरी वाढली आहे. भाजपचे इच्छुक उमेदवार या प्रकरणी स्थानिक नेत्यांना धारेवर धरत त्यांच्याकडे जाब विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त विश्वास व्यक्त केला आहे.

बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांशी साधणार संवाद

चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. पण भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. ते सर्वजण आपले अर्ज मागे घेतील. भाजप आपल्या सर्व नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधेल. मला विश्वास आहे की, जे कार्यकर्ते पक्षावर काही काळापुरते नाराज झालेत ते पुन्हा पक्षाचे काम करतील.

भाजप प्रदेशाध्यक्षांनी चंद्रपूरच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची एक यादी जाहीर केली होती. ती यादी डावलत भाजप जिल्हाध्यक्षांनी काही लोकांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईही झाली आहे. पत्रकारांनी याविषयी चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता या कारवाईचे जोरदार समर्थन केले. चंद्रपूरची कारवाई योग्यच आहे. प्रदेशाध्यक्षांनी मंजूर केलेली उमेदवारांची यादी परस्पर बदलणे हे काही योग्य नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी तेथील अध्यक्षांना काढून टाकले आहे, असे ते म्हणाले.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचे समर्थन

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्याच्या मुद्यावरही यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, एखादा गुन्हा दाखल होणे किंवा एखाद्यावर केस रजिस्टर झाल्याने काही होत नाही. कोर्टात काय सिद्ध होते हे महत्त्वाचे असते. साधारणतः एफआयआरमध्ये नाव असले तरी शेवटी गुन्हा कोर्टात सिद्ध होणे महत्त्वाचे असते. कोर्टात गुन्हा सिद्ध झाला असल्यास त्या व्यक्तीला उमेदवारी देता येत नाही. त्यामुळे आता एफआयआरमध्ये नाव असलेल्या लोकांना काही पक्षांनी उमेदवारी दिली आहे. या प्रकरणी कोर्टात निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्यावर भाष्य करता येईल.

शिवसेना – भाजपचा युतीवरच भर

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे घटकपक्ष वेगवेगळे लढणार की महायुती म्हणून एकत्र सामोरे जाणार असा प्रश्नही यावेळी बावनकुळेंना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, आमचा संकेत महायुतीचाच आहे. पण स्थानिक पातळीवर शिवसेना – भाजपचे आपसात न जमल्यामुळे काही ठिकाणी युती झाली नाही. पण राज्य पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीचेच संकेत दिलेत. त्यामुळे आम्ही युतीमध्येच जाणार आहोत. पण वरच्या पातळीवर युती झाल्यानंतर कधीकधी दोन्ही पक्षांकडून खालच्या पातळीवर अडचणी तयार होतात. यामुळे काही ठिकाणी युती तुटली आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पुन्हा एकत्र बसून यावर चर्चा करू, असे बावनकुळे म्हणाले.

जिल्हा परिषदेची निवडणूक केव्हा होणार?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा फड लवकरच रंगणार असल्याचेही सांगितले. निवडणूक आयोगाचा जो काही कार्यक्रम आला आहे त्यात 12 जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांच्या आत आहे. त्या निवडणुका केव्हाही घेता येतील. राहिला प्रश्न सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीच्या दिलेल्या अंतिम मुदतीचा, त्या आधारावर आयोग आपला निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *