![]()
बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनधिकृत पुतळ्याच्या स्थापनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून हा प्रश्न चिघळत असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासनाने कलम 163 अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. सोशल मीडियावर विविध अफवा पसरत असल्याने त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गावच्या सरपंचासह एकूण 23 जणांना अटक केली असून चाळीसपेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात मध्यरात्री झालेल्या पुतळा स्थापनेपासून झाली. 4 फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी चिखला काकड येथील अंगणवाडी परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी उभारला. त्या वेळी शेकडो शिवभक्त उपस्थित असल्याचे सांगितले जाते. मात्र पुतळा उभारण्यासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नव्हती. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर बीबी पोलिसांनी 5 फेब्रुवारी रोजी महसूल विभागाला अहवाल पाठवत पुतळा हटवण्याची शिफारस केली. महसूल प्रशासनाने या अहवालाची सखोल चौकशी केली. त्यानंतर लोणार तहसील कार्यालयाने 11 फेब्रुवारी रोजी स्थानिक ग्रामपंचायतीला आदेश देत पुतळा योग्य ती कारवाई करून हटवावा, असे स्पष्ट निर्देश दिले. पुतळा अज्ञातांनी आणि विनापरवानगी बसवला असल्याने तो कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्याचे प्रशासनाने नमूद केले. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईला अधिकृत आधार असल्याचे स्पष्ट झाले, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, पुतळा हटवण्याच्या चर्चेमुळे गावात दोन गट आमने-सामने आले. परवा याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला आणि वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. तरीही काही ठिकाणी धक्काबुक्की आणि वादाच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हे नोंदवून कारवाई सुरू केली. चिखला काकड येथील सरपंच गणेश काकड यांच्यासह 23 जणांना अटक करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलिसांनी गावात संचारबंदी लागू केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर कोणतीही भडकाऊ पोस्ट शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाकडून गावात शांतता राखण्याचे प्रयत्न सुरू असताना बाहेरून कोणीही अनधिकृत जमाव करु नये, असेही सांगण्यात आले आहे. बीबी गावात सत्य कथन मेळावा दरम्यान, पोलिसांच्या कारवाईविरोधात वंजारी समाजाने भूमिका घेतली आहे. चिखला काकड परिसरातील वंजारी समाजाने गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बीबी गावात सत्य कथन मेळावा, आयोजित केला आहे. राज्यभरातील वंजारी समाजबांधवांना या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती मांडली जाईल, असा दावा समाजाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. कायदेशीर प्रश्न आणि सामाजिक तणावही वाढला एकूणच, चिखला काकड गावातील पुतळा प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. विनापरवानगी उभारलेल्या पुतळ्यामुळे कायदेशीर प्रश्न निर्माण झाले असून त्यावरून सामाजिक तणावही वाढला आहे. प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्याचा निर्णय घेतला असला, तरी गावातील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे. पुढील काही दिवस परिस्थिती कशी बदलते आणि संवादातून तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव:23 जणांना अटक; पोलिसांचा बंदोबस्त, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
