![]()
“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही घातपात दडलाय? यावर सरकारने मौन सोडून स्पष्टीकरण द्यावे. देशात यावर चर्चा सुरू असताना सरकार केवळ दोन ओळींच्या स्पष्टीकरणात बोळवण का करत आहे?” असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. अजित पवारांच्या विमान अपघातावर सरकारकडून उत्तर दिले जात नसल्याचा आरोप करत, आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. शासनाने फक्त दोन ओळींचं स्पष्टीकरण दिलं जातं की अपघातावर कुणीही प्रश्न निर्माण करु नये. का करु नये? हा घातपात आहे की अपघात आहे? याची देशभरात चर्चा सुरु आहे. अशा वेळी आम्ही अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या चहापानाला का जायचं? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’ वडेट्टीवारांचा सवाल भाजपच्या निवडणुकीतील जुन्या जाहिरातीचा संदर्भ देत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “भाजपाचे घोषवाक्य होते कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आज आमचा प्रश्न तोच आहे की महाराष्ट्र आज कुठे आहे? शेतकरी, सामान्य माणूस सगळे कुठे आहेत? महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात अडकला आहे. त्यामुळे कुठे आहे महाराष्ट्र हा प्रश्न निर्माण होतो,” असे ते म्हणाले. शेतकरी आत्महत्यांचे सत्र आणि ‘लुटी’चा आरोप राज्यातील कृषी संकटावर भाष्य करताना विजय वडेट्टीवार यांनी भीषण आकडेवारी सादर केली. केवळ गेल्या एका महिन्यात यवतमाळमध्ये २२ आणि मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याचे त्यांनी सांगितले. सावकाराच्या कर्जापोटी महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागते, ही राज्यासाठी शरमेची बाब असल्याचेही ते म्हणाले. मक्याला २४०० रुपये हमीभाव असताना शेतकऱ्यांना केवळ १५०० ते १६०० रुपये मिळाले. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचीही मोठी लूट सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. लाडक्या बहिणींना ३००० का देत नाही? लाडकी बहीण योजनेवरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. “जर सरकारने दावोसमध्ये जाऊन ३० लाख कोटींचे करार केले असतील आणि एवढी मोठी गुंतवणूक येत असेल, तर लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी ३००० रुपये का देत नाही? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. खरे तर हे सर्व ढोंग असून महाराष्ट्र लुटला जात आहे. सरकारी कामात २५ टक्क्यांपर्यंत कमिशनखोरी सुरू असून सर्व कामे ‘मॅनेज’ केली जात आहेत,” असा खळबळजनक दावा देखील विजय वडेट्टीवार यांनी केला. गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिकेची मागणी दावोसमध्ये झालेले करार आणि राज्यातील प्रत्यक्ष गुंतवणूक यावर सरकारने ‘श्वेतपत्रिका’ काढलीच पाहिजे, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. केवळ जाहिरातबाजी करून महाराष्ट्र पुढे जाणार नाही, तर त्याचे वास्तव चित्र जनतेसमोर आले पाहिजे, असेही विजय वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले.
अजित पवारांचा अपघात आहे की घातपात?:सरकारकडून दोन ओळींत स्पष्टीकरण, मग आम्ही चहापानाला का जायचं? – विजय वडेट्टीवार
