भिगवण अपहरण प्रकरण:तरुणीला शोधण्यासाठी 6 पथके रवाना; अपहरणकर्ता आधीपासूनच तरुणीच्या संपर्कात, पोलिसांचा दावा




पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या एका तरुणीचे भरदिवसा आई आणि भावासमोर अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. अपहरण करणाऱ्या दोन तरुणांनी आई आणि भावाच्या डोळ्यात तिखट फेकून तरुणीला नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या संदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण-तरुणीमध्ये मोबाइलवरून संपर्क असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही घटना अपहरणाची आहे की प्रेमसंबंधातून घडलेला प्रकार, याबाबत शक्यता तपासल्या जात आहेत. या घटनेप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपीला शोधण्यासाठी 6 टीम रवाना करण्यात आल्या आहेत. गोपनीय आणि तांत्रिक तपास सुरू आहे. काल वातावरण तापले होते, सर्व समाजाच्या प्रतिनिधींसोबत आमचे बोलणे झाले आहे. तसेच पोलिस काटेकोरपणे तपास करत आहेत, असेही गिल यांनी म्हटले आहे. तसेच कोणीही ताणतणावाचे वातावरण निर्माण करू नये. पोलिसांकडून जन आक्रोश मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. कुटुंबाला आम्ही माहिती देत असून त्यांच्याकडूनही माहिती घेत आहोत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आम्ही केले आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपी आणि पीडित एकमेकांच्या घराशेजारी राहतात, ते संपर्कात होते, याचा तपास सुरू आहे, बाकी माहिती तपास पुर्ण झाल्यानंतर समोर येईल, असे संदीप सिंह गिल यांनी म्हटले आहे. आमदार गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया या प्रकरणावरून राजकीय नेत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, भिगवण येथून एका हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. त्या मुलीला पळवून नेण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. तसेच पोलिसांशी देखील आमचे बोलणे झाले आहे. भिगवण येथे आम्ही जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. तसेच मुलींनी देखील खबरदारी घेतली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *