सोलापुरात रूपभवानी मंदिर परिसरात अपघात:पहाटे चार वाजता मृत्यूचा धडाका; अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन युवकांचा जीव गेला




राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून प्रत्येक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. ती घटना अजूनही ताजी असतानाच आता सोलापूर शहरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर शहरातील रूपभवानी मंदिर परिसरात आज पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ही गंभीर दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुण दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पहाटेची वेळ असल्याने परिसरात फारशी वर्दळ नव्हती. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे नागेश गवंडी, रोहन पोरे आणि बसवराज चनशेट्टी अशी आहेत. तिघेही सोलापूर शहरातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात शोककळा पसरली असून मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तरुण वयात तिघांचा मृत्यू झाल्याने शहरभरातून संवेदना व्यक्त होत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचर तपासणी घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघात कसा घडला याचा तपास सुरू आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. मात्र, अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरही अपघात दरम्यान, राज्यातील इतर भागांतही अपघातांच्या घटना समोर येत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर झाराप पेट्रोल पंपासमोर नुकताच दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात मनीष पेडणेकर हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मनीष पेडणेकर हा वेताळबांबर्डे येथील रहिवासी होता. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून कुडाळ पोलिस अधिक तपास करत आहेत. रस्ते सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न सलग घडणाऱ्या या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि विशेषतः पहाटे किंवा रात्रीच्या वेळी अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सोलापूरमधील ताज्या घटनेने शहर हादरले असून तीन तरुणांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासानंतर अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होणार असले तरी, या घटनांनी रस्ते सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *