मसाप निवडणूक: 'साहित्य संवर्धन आघाडी'चा जाहीरनामा प्रसिद्ध:साहित्य चळवळ, वाचनसंस्कृती बळकट करण्याचे आश्वासन




महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) निवडणुकीसाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी आघाडी आगामी काळात ठोस कार्यक्रम राबवणार असल्याचे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण यांनी सांगितले. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदाच्या उमेदवार डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर आणि पुणे जिल्हा कार्यवाहपदाचे उमेदवार संदीप भानुदास तापकीर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना योगेश सोमण यांनी सांगितले की, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपूर्ण कारभार घटनात्मक चौकटीत, पारदर्शक आणि सदस्याभिमुख पद्धतीने चालवला जाईल. प्रमुख कार्यवाहपदाच्या उमेदवार डॉ. स्वाती महाळंक यांनी परिषदेच्या राज्यभरातील जिल्हा शाखा अधिक सक्षम करण्यासाठी दरवर्षी ठराविक आर्थिक साहाय्य देण्याचे धोरण राबवले जाईल, असे स्पष्ट केले. या निधीतून स्थानिक पातळीवर साहित्यिक उपक्रम, वाचन चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. त्या पुढे म्हणाल्या की, दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन आयोजित करून स्थानिक लेखकांना दर्जेदार लेखनासाठी प्रेरणा व व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. तसेच, युवा लेखकांना योग्य दिशा देण्यासाठी लेखन कार्यशाळा, संवाद सत्रे आणि मार्गदर्शन शिबिरे शाखांच्या माध्यमातून राबवली जातील. कोषाध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर यांनी सांगितले की, परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या परीक्षांना राज्य शासनाची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांशी समन्वय साधण्यात येईल. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूसाठी अधिक विस्तीर्ण जागा मिळवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. परिषदेच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जाईल. आजीव सदस्यांना ग्रंथ प्रकाशन व अन्य उपक्रमांसाठी सभागृह अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून दिले जाईल आणि ‘साहित्य पत्रिका’ पुन्हा मुद्रित स्वरूपात प्रत्येक आजीव सदस्यापर्यंत पोहोचवली जाईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तो सार्थ ठरेल असे कृतीशील कार्यक्रम राबवले जातील, असेही निफाडकर यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्हा कार्यवाह पदाचे उमेदवार संदीप भानुदास तापकीर यांनी सांगितले की, ‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला उदंड प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या ‘१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या’ निमित्ताने कार्यक्षेत्रात १०० पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले. तसेच ‘जिथे मराठी तेथे साहित्य परिषद’ या संकल्पनेतून जगभरातील मराठी माणसाला मराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. साहित्य निर्मिती करताना लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवणे, परप्रांतीयांमध्ये मराठीविषयी आस्था निर्माण करणे आणि लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक व विक्रेते या सर्व घटकांसाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *