![]()
देवेंद्र फडणवीस हवालदार आहेत की कमिशनर हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले असून म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले आहे. तुमचे नेते आणि तुम्ही हवालदारसुद्धा नाहीत. राजकारणात ‘रायंदर’ बनलेल्या संजय राऊतांनी आधी स्वतःची उंची मोजावी आणि मगच फडणवीस यांच्यावर बोलावे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांनी मोदींची चिंता करु नये, जनता ही केवळ डायलॉगबाजीला नाही तर कामाला महत्त्व देते. हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या वाटेवर गेलेले राऊत आता पूर्णपणे उघडे पडले आहेत आणि त्यांची नौटंकी महाराष्ट्राने ओळखली आहे. ते मनकवडे नाहीत तर कवडीमोल आहेत. नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसच्या 60 वर्षांच्या कार्यकाळात जेवढ्या संस्था उभारल्या गेल्या, त्यापेक्षा तीनपट संस्था गेल्या 12 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उभारल्या गेल्या आहेत. म्हणूनच जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले आहे. राऊतांनी मोदींवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या खासदार निधीतून महाराष्ट्रात कोणती कामे केली, याचा हिशोब आधी जनतेला द्यावा. काँग्रेसने देशात आयआयटी (IIT) आणि एम्स (AIIMS) उभ्या केल्याच्या राऊतांच्या दाव्यावर बोलताना त्यांनी असे म्हटले आहे. ‘महाभारताचा अपमान अन् मुघलांचे प्रेम’ नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसचे गुणगान गाताना राऊतांनी महाभारत, हिंदू धर्मग्रंथ आणि विद्यापीठांच्या कुलगुरूंचा अपमान केला आहे. तांच्या राजकारणासाठी राऊतांना महाभारताच्या गौरवशाली इतिहासापेक्षा मुघल आणि औरंगजेब प्रिय झाला आहे. ज्या मुघलांनी हिंदूंवर अत्याचार केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, त्यांचा उदो-उदो राऊतांकडून सुरू आहे. या अपमानाबद्दल देशातील हिंदू समाज त्यांना कधीही माफ करणार नाही. राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवरून सवाल नवनाथ बन म्हणाले की, परदेशात जाऊन भारताची बदनामी कोण करत आहे, हे राऊतांनी राहुल गांधींना विचारले पाहिजे. राहुल गांधी महिन्यातील 15 दिवस परदेशात राहतात आणि देशाची बदनामी करतात, याबद्दल राऊतांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. भाजपच्या अनेक नेत्यांची मुले भारतामध्येच शिक्षण घेत आहेत. पेपरफुटीच्या कडक कायद्यामुळे पोटदुखी नवनाथ बन म्हणाले की, पेपरफुटी प्रकरणातील कायदे अधिक कडक केले जात असल्याने संजय राऊतांच्या पोटात दुखत आहे. राऊतांना कायदा नको आहे, कारण त्यांना देशातील तरुणांची माथी भडकवून देश पेटवायचा आहे. देशातील तरुण या कडक कायद्याचे स्वागत करत असल्यामुळेच राऊत अस्वस्थ झाले आहेत.