भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानात जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य:डॉ. प्रवीण देशमुख यांचे संत गाडगेबाबा विद्यापीठात प्रतिपादन

0
b0e0bf20-af72-4c9d-8385-b372b47a37a0_1770305048021.jpg




यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील शिवशक्ती विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक डॉ. प्रवीण देशमुख यांनी म्हटले आहे की, भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानात जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. समाजाचे अध:पतन होत असल्याने त्याचे सर्वांगीण प्रबोधन आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. हे व्याख्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातर्फे आयोजित करण्यात आले होते. श्री संत मारोती महाराज संस्थान, माकनेर यांच्या दाननिधीतून ‘आध्यात्मिक लोकशाहीचे श्रेष्ठ भाष्यकार’ या विषयावर हे व्याख्यान झाले. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते अध्यक्षस्थानी होते, तर दानदात्यांचे प्रतिनिधी प्रा. दिवाकर देशमुख आणि रासायनिक तंत्रशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. बी. नाईक मंचावर उपस्थित होते. डॉ. देशमुख यांनी पुढे सांगितले की, आज नीतीमान आणि चिकित्सक समाजाची गरज आहे. विज्ञानमूल्ये आणि आध्यात्मिक जोड असलेला समाज घडल्यास भारताला विश्वगुरु बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. भारत भूमी ही सर्व संतांची जन्मभूमी असून, ती विविध संप्रदायांची आश्रयदाती आहे. संत ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक लोकशाहीची सुरुवात केली आणि संतांनी समाजासाठी मोठे कार्य केले आहे, असेही त्यांनी नमूद केले. सध्या संत साहित्याची अत्यंत आवश्यकता आहे. समाजातील अंधकार दूर करण्यासाठी संतांनी जसे कार्य केले, त्याचप्रमाणे आजच्या विस्कळीत समाजाला सावरण्यासाठी संत मारोती महाराज, गणपती महाराज आणि गुलाबराव महाराज यांच्या विचारांची तरुणांना ओळख करून देणे महत्त्वाचे आहे, अशी मांडणीही या कार्यक्रमात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान प्रा. दिवाकर देशमुख यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा आणि श्री संत मारोती महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली, त्यानंतर विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. डॉ. ए.बी. नाईक यांनी प्रास्ताविक केले, कृती बारबुध्दे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रदीप वानखडे यांनी आभार मानले. या व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, श्री संत मारोती महाराज संस्थानचे विश्वस्त आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी ‘व्यसनाच्या आहारी जाऊ नका’ असे आवाहन केले. सध्या व्यसनाधीनतेचे मोठे संकट असून, मोबाईलचेही मोठे वेड तरुणांमध्ये दिसत आहे. त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास, न्यूक्लियर फॅमिली आणि लिव्ह-इन रिलेशनशिप यांसारख्या संकल्पनांमुळे भारतीय समाजव्यवस्था आणि कौटुंबिक वीण विस्कळीत होत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed