मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईकवरून विधानभवनात दाखल:गडकरींकडूनही ताफ्यात 50 टक्के कपात; इंधन बचतीसाठी मोठं पाऊल
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनानंतर राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडूनही त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज स्वतः बाईक चालवत विधानभवनात दाखल झाले. मुख्यमंत्री बाईकवरून विधानभवनात पोहोचल्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही या निर्णयाची मोठी चर्चा रंगली. इंधन बचत आणि अनावश्यक ताफे कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आली असून, सरकारी यंत्रणांकडूनही खर्च नियंत्रणावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत बाईकचा वापर केल्याने प्रशासन आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनाही एक वेगळा संदेश दिला गेल्याची चर्चा सुरू आहे. वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक आणि कमी इंधन वापराच्या पर्यायांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या सोलापूर दौऱ्यात मोठा निर्णय घेत व्हीआयपी संस्कृतीला फाटा दिला आहे. पंढरपूर आणि अक्कलकोट येथे विकासकामांची पाहणी तसेच भूमिपूजन कार्यक्रमासाठी ते आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून केवळ तीन वाहनांचा वापर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. या वाहनांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे एक वाहन, प्रांताधिकारी-तहसीलदारांचे एक वाहन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे एक वाहन समाविष्ट असणार आहे. शक्य तिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. शक्य तिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा, कार्यालयीन कामांसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि सरकारी खर्चात बचत या तिन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी राज्य आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
