![]()
शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी खराब रस्त्यावरून चांगलाच संताप व्यक्त केला आहे. उद्या मी मंत्री नसलो आणि माझ्याकडे असा रस्ता असेल तर मी खुटा उपटून मारेन, अशा शब्दात त्यांनी झापले आहे. तसेच सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्यांना या निवडणुकीतून फक्त पैसे कमवायचे असतात. म्हणून ते कोणीकडूनही तिकीट घेतात आणि पैसा वाटून निवडून येतात, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी आमदारांवर टीका केली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, लातूरमधील भाजप आणि कॉंग्रेस उमेदवार हे दोघेही दांडगे आहेत. त्यांना फक्त पैसा कमवायचे आणि वाटायचे आहेत. त्यामुळे दोघेपण एकमेकांना ‘आय लव्ह यू’ म्हणतात, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच कॉंग्रेसवाल्यांचा सत्यानाश होऊ द्या. जर मी उद्या मंत्री नसलो आणि माझ्याकडे असा रस्ता असेल तर मी खुटा उपटून मारेन, असे म्हणत त्यांनी कामखेड ते रेनापूर रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेवरून संताप व्यक्त केला. माझ्यावर केस झाली तरी परवा नाही या रस्त्याने या भागाच्या आमदाराला गावात पुन्हा येऊ देऊ नका, रस्ता दुरुस्त करा आणि मगच गावात या, असा सल्ला गुलाबराव पाटलांनी गावकऱ्यांना दिला आहे. या रस्त्याने प्रवास करताना प्रत्येकाला त्रास होत आहे. जर मी उद्या मंत्री राहिलो नाही आणि माझ्याकडे असा रस्ता असेल तर मी संबंधितांना मारेल, मग माझ्यावर केस झाली तरी परवा नाही, अशा शब्दात पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमची मुले गुबगुबीत झाली की भाजप मांडीवर बसवून घेते पुढे बोलताना गुलाबराव पाटलांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शिवसेना पक्षात कार्यकर्ते तयार होतात आणि तयार झालेली कार्यकर्ते भाजप, कॉंग्रेस यांसारख्या पक्षात घेतले जातात. त्यामुळे आम्ही मुले जन्माला घालायचे आणि मुले गुबगुबीत झाली की भाजपने मांडीवर बसवून घ्यायचे, असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचे हवाई उड्डाण रद्द दरम्यान, गुलाबराव पाटील यांचे लातूर्हून परतीचे हवाई उड्डाण रद्द करण्यात आले. हवाई यंत्रणांकडून क्लिअरन्स न मिळाल्याने त्यांचे लातूर येथून होणारे हवाई उड्डाण रद्द करण्यात आले आहे. ‘एव्होसेट एव्हिएशन’ कंपनीच्या सहा आसनी विमानाने साडेचार वाजता उड्डाण करणे अपेक्षित होते, मात्र हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथील हवाई यंत्रणांकडून आवश्यक ‘क्लिअरन्स’ मिळण्यास विलंब झाला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रतीक्षा करूनही परवानगी न मिळाल्याने, सुरक्षिततेच्या कारणास्तव वैमानिकाने विमान उड्डाणास असमर्थता दर्शवली. वाचा सविस्तर
संबंधितांना खुटा उपटून मारेन:खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटलांचा संताप, भाजपवरही जोरदार टोलेबाजी
