![]()
महापालिका निवडणुका पार पडल्या आणि आता महापौर पदासाठी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. मुंबईत मोठा वाद सुरू असतानाच आता कोल्हापुरात महापौर शिवसेनेचाच होईल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटले की, कोल्हापुरात महापालिकेत महायुती म्हणून निवडणुका व्हाव्यात असा माझा प्रामाणिक हेतू होता. युतीमध्ये कोणताही मिठाचा खडा पडू नये यासाठी माझ्या प्रयत्न आहे. या निवडणुकीत शिवसेनेने मोठा त्याग केला आहे. विधानसभेत कोल्हापूर उत्तरची प्रत्येक पेठ शिवसेनेसोबत होती, याची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीतही झाली. या निवडणुकीत भाजपला 26, शिवसेनेला 14, राष्ट्रवादीला 4 आणि जनसुराज्यला 1 अशा 46 जागा आल्यामुळे नैसर्गिक हक्काने कोल्हापूरचा महापौर हा शिवसेनेचाच होईल, असे क्षीरसागर म्हणाले. शिवसेना-कॉंग्रेस एकत्र येणार असल्याचा निगेटिव्ह नरेटीव्ह पुढे बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, निगेटिव्ह नरेटीव्ह सेट करणाऱ्या बादशहांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र येणार असा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी देखील भूमिका स्पष्ट करतो. कोल्हापूर महापालिकेत महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू. 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची इच्छा आज पूर्ण होत आहे. ‘उत्तर’ची सर्व पेठ शिवसेनेबरोबर थेट राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूरात महापालिका निवडणुकीत महायुतीच्या विजयात शिवसेनेने महत्त्वाचा वाटा उचलला. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी यासाठी सुरवातीपासून माझा प्रामाणिकपणे प्रयत्न होता. महायुतीत कोणत्याही प्रकारचा मिठाचा खडा पडू नये यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला. जागा वाटपात शिवसेनेने मोठा त्याग केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘उत्तर’ची सर्व पेठ शिवसेनेबरोबर थेट हे विधानसभेत पाहिले होते. ते आता महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 20 पैकी 16 प्रभागात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. कसबा बावड्यात बोगस मतदान झाले कसबा बावड्यात पराभूत झालेल्या आमच्या उमेदवारांनी आज माझी भेट घेतली. कसबा बावड्यात बोगस मतदान कसे नोंदवले जाते, दादागिरी कशी चालवली जाते, याची माहिती त्यांनी मला दिली, अशी माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली. तसेच त्या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले असले तरी विजय आमचा आहे. बोगसगिरी करून शेवटी मी फार मोठा शहाणा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीला लोकांनी चोख उत्तर दिले आहे, असेही क्षीरसागर म्हणाले.
कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होणार:निवडणुकीत आम्ही मोठा त्याग केलाय, आमदार राजेश क्षीरसागरांचा दावा
