![]()
अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपविरोधातील आक्रमक भूमिका आणखी तीव्र केली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईत राम मंदिरासमोर रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात सहभागी होत भाजपवर जोरदार टीका केली. “प्रभू रामचंद्रांच्या नावावर श्रद्धेचा बाजार मांडून सत्ता मिळवणाऱ्यांना हिंदूंनी ओळखण्याची वेळ आली आहे,” असा घणाघात त्यांनी केला. ‘राम मंदिरातील देणगीची लूट म्हणजे हिंदूंचा अपमान’ अरविंद सावंत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर राज्यभर रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण करून हिंदूंमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. “अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दानाची लूट होत असेल, तर तो केवळ आर्थिक गैरव्यवहार नाही, तर संपूर्ण देशातील हिंदू समाजाचा अपमान आहे,” असा आरोप त्यांनी केला. ‘भोंदू हिंदुत्ववाद्यांना जनता ओळखेल’ भाजपवर टीका करताना सावंत म्हणाले, “यांना प्रभू राम किंवा हनुमान यांच्याशी काही देणं-घेणं नाही. त्यांच्यासाठी सत्ता हाच राम आणि सत्ता हाच हनुमान आहे. प्रभू रामचंद्रांच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी केला जात आहे.” त्यामुळे राज्यभर रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणत श्रद्धेचं जागरण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामाच्या नावाने आंदोलन करू नये, असे केलेल्या वक्तव्यालाही सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. “राम मंदिरासाठी देशभर रथयात्रा कोणी काढली होती? लालकृष्ण अडवाणी यांनी रामाच्या नावाने आंदोलन केले नव्हते का? मग आज आम्ही रामरक्षा म्हणत आंदोलन केलं तर त्यात चुकीचं काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘श्रद्धेचा बाजार मांडून सत्ता मिळवली’ शिवसेनेने राम मंदिरासाठी सुरुवातीपासून योगदान दिल्याचा उल्लेख करत सावंत म्हणाले, “शिवसेनेने सर्वप्रथम देणगी दिली. अनेक समाजघटकांनी चांदी आणि इतर वस्तू अर्पण केल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आलेली रामसेतूची वीटही आम्ही मंदिरासाठी अर्पण केली. मात्र. आज श्रद्धेचा बाजार मांडून त्यातून सत्ता मिळवण्याचे काम सुरू आहे.” ‘प्रभू राम त्यागाचे प्रतीक, सत्तेचे नाही’ प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचा दाखला देत सावंत म्हणाले, “रामाने लंका जिंकली, पण स्वतः राजा झाले नाहीत; विभीषणाला राज्य दिलं. किष्किंधा जिंकून सुग्रीवाला राज्य दिलं. प्रभू राम त्याग, न्याय आणि कर्तव्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा वापर सत्तेसाठी करणे चुकीचे आहे.” ‘रामरक्षा आंदोलन नाही, श्रद्धेचे जागरण’ नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलनासाठी जागा नाकारण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप त्यांनी केला. “हे आंदोलन नाही. हे श्रद्धेचं, अस्मितेचं आणि हिंदू समाजाला जागं करण्याचं अभियान आहे. शांततेत कार्यक्रम होत असतानाही त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. ‘हिंदुत्वावर आम्हाला शिकवू नका’ भाजपला हिंदुत्वावरून लक्ष्य करत सावंत यांनी १९८७ च्या निवडणुकीचा उल्लेख केला. “शिवसेनेने ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’चा नारा त्या काळात दिला होता. त्यामुळे हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आम्ही श्रद्धेचं राजकारण करत नाही, पण श्रद्धेचा अपमान करणाऱ्यांना प्रश्न विचारत राहू,” असे ते म्हणाले. संबंधित बातमी वाचा… रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र:रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे दिले निमंत्रण अयोध्येतील राम मंदिरात होत असलेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेत ‘रामरक्षा’ हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत येत्या १८ जुलै २०२६ रोजी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे थेट निमंत्रण ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे दिले आहे. या पत्रातून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हिंदुत्वाची आठवण करून देत जोरदार राजकीय टोलाही लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
रामाच्या नावावर सत्ता, श्रद्धेचा बाजार नाही:अयोध्या राम मंदिर देणगी प्रकरणावरून अरविंद सावंतांचा भाजपवर हल्लाबोल
