स्मॉल वंडर्स कॉन्व्हेंटचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात:स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांना घडवण्याची संधी – कांचन मुरके‎




प्रतिनिधी | अमरावती शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पहाता मुलांच्या कलागुणांना समोर आणून त्यांना घडवण्याची एक संधी म्हणून बघायला हवे, असे प्रतिपादन कांचन मुरके यांनी केले. स्मॉल वंडर्स कॉन्व्हेंटच्या वतीने आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात आला. स्नेह संमेलन कार्यक्रमात लेखिका व पत्रकार कांचन मुरके, शकुंतला सागर, सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव बोरखडे, गंभीर भोयर, समाजसेविका विद्या लाड, ग्राम गीताचार्य कृष्णा माकोडे, डॉ. प्रेमदास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कांचन मुरके पुढे बोलतांना सांगितले की, त्यांनी दरवर्षी स्मॉल वंडर्स स्कूल विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना विकसित करण्यासाठी व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. नृत्य, अभिनय, कथा, भाषणे, संवाद, सुंदर हस्ताक्षर, चित्रकला अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या आत दडलेल्या कलेला प्रोत्साहन दिले आहे. शिक्षणासह प्रत्येक विद्यार्थ्यांमधे असलेल्या कलेला बाहेर आणून त्यांना मार्गदर्शन करत त्याचा सराव घेणे हे फार महत्त्वाचे आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, एकांकिका, विविध सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात पालक, ग्रामस्थ, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक अहमद शेख, शंकर मालखेडे, विजय फुलकर, नितीन गवळी, प्रेमकुमार इंगोले, वैभव करडे, अक्षय वानखेडे, शनो शेख, नीता फुटाणे, रुबीना शेख, कल्पना दाते, सीमा झोटिंग, कोयल मुरके, रंजना आवारी यांच्यासह विद्यार्थी आणि पालक वर्गाने विशेष योगदान दिले. स्नेहसंमेलन संयोजन व नियोजन प्राचार्य डॉ. मंजुषा डी. सागर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *