एक 2 वर्षांचा मुलगा वाजंत्ऱ्यांचा आवाज ऐकत बॅन्डवाल्यांच्या मागे मागे गेला. एका वाड्याच्या बाहेर तो आवाज ऐकत तिथेच ओट्यावर झोपी गेला. इकडे त्याचे वडील गावभर त्याला शोधून परेशान. शेवटी पोलिस ठाणे गाठत मुलगा हरवल्याची तक्रार करत असतानाच एक इसम तिथे लहा
.
पंडित भीमसेन जोशी…भारतीय परंपरेतील एक असा सत्त्वशील सूर, ज्याची जादू जगालाच नव्हे, तर संपूर्ण अवकाशाला व्यापून उरली आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात भीमसेन जोशी यांनी त्यांच्या अपूर्व गायकीने सर्वोच्च स्थान प्राप्त केले. ‘रागदरबार’च्या आजच्या भागात आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या जीवनाविषयी तसेच त्यांनी भारतीय संगीतात दिलेल्या योगदानाबद्दल जाणून घेणार आहोत.
भीमसेन जोशी यांचा जन्म कर्नाटकातील गदग येथे 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला. भीमसेन जोशी यांचे वडील गुरुराज जोशी हे संस्कृत पंडित होते. त्यांना वाटायचे की भीमसेनने संस्कृतचा अभ्यास करून पंडित व्हावे. भीमसेन यांचे प्राथमिक शिक्षण गदगमध्ये झाले. परंतु, त्यांना शालेय शिक्षणात कधीच रस आला नाही. लहान वयातच त्यांना संगीताचे वेड लागले होते.

पंडित भीमसेन जोशी यांना संगीताची विशेषतः गायनाची प्रचंड आवड होती. आपण संगीताशिवाय राहूच शकणार नाही, अशी त्यांची भावना होती. जिथे कुठे वाजंत्री ऐकू येई, त्या दिशेने भीमसेन जोशी निघायचे. भीमसेन जोशींचे हे वागणे बघून वडिलांनी चक्क त्यांच्या सगळ्या शर्टवर ‘जोशी गुरुजींचा मुलगा’ असे लिहून ठेवले. जेणेकरून भीमसेन पुन्हा कुठे वाजंत्र्यांच्या मागे मागे गेले आणि हरवले तर लोकांना समजावे आणि घरी आणून सोडतील, असा त्या मागचा उद्देश.
भीमसेन जोशी यांच्या डोक्यातून गाण्याचे वेड जायलाच तयार नव्हते. एकदा भीमसेन जोशी शाळेतून घरी आले आणि त्यांनी त्यांच्या आईला विचारले की हे ग्वाल्हेर कुठे आहे? त्यावर आईने सांगितले की ते इथून खूप लांब उत्तरेकडे आहे. हा प्रश्न विचारण्या मागची गोष्ट अशी होती की भीमसेन जोशींनी बाहेर कुठेतरी एक गाण्यातली चीज ऐकली होती आणि मास्तरांना विचारले असता ही ग्वाल्हेर घराण्याची चीज आहे. ती चीज भीमसेन जोशींना फार आवडली होती. त्यांनी मनाशी पक्क केले होते की आता ग्वाल्हेरला जाऊनच गाणे शिकायचे आणि वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी त्यांनी गुरूंच्या शोधात घर सोडले.
सरावासाठी भीमसेन जोशी उस्ताद अब्दुल करीम खान, वझेबुवा, केसरबाई केरकर तसेच उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या रेकॉर्डिंग ऐकत रियाज करायचे. पु. ल. देशपांडे यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत सांगताना भीमसेन जोशी म्हणतात, “खाँसाहेबांची पहिली रेकॉर्ड निघाली ‘पिया बिन..’ आमच्याकडे एक दुकानदार होता. तो नवीन रेकॉर्ड आली की जाहिरातीसारखी लावायचा. आतासारखे पेपरमध्ये वगैरे येत नव्हते. शाळा सोडून मी तिथे जाऊन बसायचो. ते इतक्या वेळेला ऐकले की असे वाटायचे, अशा प्रकारचे गाणे मला यायला पाहिजे. हा निश्चय मनात पक्का केला.”

भीमसेन जोशी घर सोडून गुरूंच्या शोधात गेले आणि इकडे सगळीकडे शोधाशोध सुरू झाली होती. त्यांच्या वडिलांना एवढी खात्री होती की संगीताच्या शोधातच आपला मुलगा भटकत असणार. खिशात पैसा आणि खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत भीमसेन जोशी यांनी ग्वाल्हेर, लखनऊ, रामपूर अशी शहरे पालथी घातली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रवास त्यांनी विनातिकीट केला. याचाही एक किस्सा आहे..
भीमसेन जोशी गुरूच्या शोधात ग्वाल्हेरपर्यंत गेले. या प्रवासात त्यांच्या खिशातले पैसे संपले की ते रेल्वेत गाणं गायचे. लोकांना वाटायचे, हा भिकाऱ्याचा पोरगा लहान असून सुद्धा छान गातो. म्हणून जेवायला द्यायचे. कोणी पैसे द्यायचे असे. असे करत त्यांनी चतुराईने रेल्वेचा प्रवास केला. एकदा तर भीमसेन जोशींना एका पोलिस शिपायाने पकडले, तेव्हा देखील भीमसेन यांनी त्यांनाही गाणे ऐकवले आणि त्या शिपायाने सोडूनही दिले.
इकडे भीमसेन जोशींच्या वडिलांनी शोधमोहीम सुरू केलीच होती. अखेर जालंधर येथे पंडित मंगतराम यांच्या घरी भीमसेन जोशी सापडले. तिथून त्यांच्या वडिलांनी त्यांना घरी आणले. मुलाचे गाण्यासाठीचे विलक्षण वेड पाहता, वडिलांनी भीमसेन जोशींना त्यांच्या गावाजवळ कुंदगोळ गावी नेले. तिथे रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे भीमसेन जोशींनी शिकण्यास सुरुवात केली. परंतु, रामभाऊ कुंदगोळकरांकडे शिकणे काही सोपे नव्हते..

पंडित रामभाऊ कुंदगोळकर (सवाई गंधर्व)
सूर चुकला आणि गुरुजींनी अडकित्ता फेकून मारला..
भीमसेन जोशींनी पंडित रामभाऊ कुंदगोळकरांकडे गुरू-शिष्य परंपरेने शिकण्यास सुरुवात केली. तिथे गुरूंनी घरच्या कामात चांगलेच जुंपले होते. रामभाऊ कुंदगोळकरांचे शिष्यत्व मिळवण्यासाठी त्यांना अथक परिश्रम घ्यावे लागले. एक-दीड किमी अंतरावरून पाणी आणावे लागायचे आणि तेव्हा मग गुरुजी त्यांना शिकवायचे.
पु.ल. देशपांडे यांनी घेतलेल्या मुलाखतीत भीमसेन जोशींनी याविषयी सांगितले आहे की, ‘रामभाऊ कुंदगोळकर गुरुजी परीक्षा बघायचे. कारण माझ्यासमोर दोन-चार माणसं गाणं शिकायला आली. तिथे पुण्याचा दुष्काळ होता. पाणी भरणे वगैरे बघून ती पळून गेली. हा खरा टिकणारा आहे की नाही, खरा शिकतो की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी वर्षभर आम्हाला शिक्षा दिली. दोन-दोन घागरी घ्यायच्या आणि विहिरीवरून पाणी आणायचे. तेव्हा त्या परीक्षेत मी पास झालो.’
पुढे भीमसेन जोशी सांगतात, ‘मी पहाटे चारला उठायचो. मग एक तासभर पाणी वगैरे भरायचे. 50-60 घागरी पाणी आणायचे. मग तंबोरा घ्यायचा. मग त्याने सुरुवात करायची. भैरव रागाचा रियाज सप्तकात करायचा. खर्ज वगैरे लावून. एकदा मी शिकत असताना माझा आवाज बसला होता. तरी सुद्धा गुरुजी रियाज करून घेत होते. पण मला त्याचा त्रास झाला नाही. मंद्रामध्ये रियाज करायला लावला जायचा. मध्य सप्तकात वगैरे नाही. विश्रांती देत-देत असा रियाज करत करत मग तो त्रास नाहीसा झाला.’
एके दिवशी सराव सुरू असताना भीमसेन जोशींचा सूर चुकला. यावर त्यांच्या गुरूंनी हातात असलेला अडकित्ता त्यांना फेकून मारला आणि त्याची खूण भीमसेन जोशींच्या डाव्या डोळ्यावर आयुष्यभर राहिली, असाही एक किस्सा फार प्रचलित आहे.
16 तासांचा रियाज..
पंडित रामभाऊ हे सवाई गंधर्व म्हणून ओळखले जायचे. त्यांच्याकडेच भीमसेन जोशी यांनी सुरुवातीचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. सवाई गंधर्व हे किराणा या घराण्याचे गायक होते. सवाई गंधर्व हे अतिशय कडक शिस्तीचे गुरू होते. भीमसेन जोशी यांच्याकडून ते सुरुवातीला रोज 8 तास रियाज करून घ्यायचे. या काळात तोडी, पुरिया, मुलतानी या रागांवर मेहनत घेतली. हा रियाज पुढे जाऊन 16 तासांचा झाला. 1936 ते 1941 या काळात भीमसेन जोशी यांनी शास्त्रीय संगीत पूर्णपणे आत्मसात केले. त्यानंतर गुरूंच्या आज्ञेने भीमसेन जोशी पुण्याला आले.
भीमसेन जोशींनी 1941 नंतर स्वतंत्र मैफिलींना सुरुवात केली. तेव्हा त्यांचे वय केवळ 19 वर्षे होते. 1950 ते 1970 या काळात तर भीमसेन जोशींचे नाव जगभर पसरले होते. ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकात लेखिका सुनीता देशपांडे लिहितात, “भाई (पु.ल. देशपांडे), वसंता (वसंत देशपांडे) आणि भीमसेन, पुण्यात पंचविशीतील तरुण जवळचे मित्र होते. त्यांना एकमेकांच्या कलेचा खूप आदर होता. पण तरुणपणीचे रक्त…एका शनिवारी पु. ल. देशपांडेच्याच घरी वसंतराव गायले ते भीमसेनच्या वरचढ, म्हणजे आदल्या शनिवारी भीमसेन गायले होते, ते सर्व आणि शिवाय इतर थोडे जास्त. पहाटे सगळे घरी गेले, पण भीमसेन यांच्यातील कलावंताचा अहंकार दुखावला गेला असावा. पु. लं.च्या घराची बेल काही तासांतच वाजली. सुनीताबाई लिहितात…”मला दुधवाला असेल असे वाटले, म्हणून दार उघडले, तर भीमसेन हजर! परत सर्व जमवाजमव केली आणि भीमसेनची एक उत्कृष्ट मैफिल झाली.”

वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, सुधीर फडके आणि हार्मोनियमवर पु.ल.देशपांडे
घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही..
पंडित भीमसेन जोशींना गाड्या फार आवडायच्या. नुसत्याच आवडत नव्हत्या तर त्या भरधाव वेगाने पळवण्याचा जणू त्यांचा छंदच होता. या बाबतीतला एक किस्सा लेखक सुधीर गाडगीळ यांनी सांगितला आहे. ते सांगतात, ‘पंडितजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडी भरधाव चालवण्यात जसा त्यांचा हातखंडा होता तसाच गाडी दुरुस्त करण्यातही ते तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिनसह सगळ्या पार्टची माहिती त्यांना होती. बिघडलेली गाडी, काय केले तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल, ही माहिती ते गॅरेजवाल्याला अगदी बिनचूक सांगायचे.’

भीमसेन जोशी आणि त्यांची मर्सिडीज कार
पुढे सुधीर गाडगीळ सांगतात, ‘एकदा नगरला कार्यक्रमाला जायचे होते. पंडितजींनी नुकतीच नवीन मर्सिडीज घेतली होती. मी त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी मर्सिडीज काढली आणि म्हणाले बसा. गाडी अर्थातच पंडितजी चालवत होते. सवयीने त्यांनी ती फूल स्पीडमध्ये सोडली होती. तासाभरातच आम्ही कोरेगाव भीमाला पोहोचलो. समोर नदीवरचा पूल होता. पलीकडे एक ट्रक येताना दिसत होता. पूल तसा अरुंदच होता. पण पंडितजी काही वेग कमी करायला तयार नव्हते. मी जीव मुठीत धरून गाडीत बसलो होतो आणि ट्रक अगदी गाडीच्या शेजारून गेला पण धक्का न लागता.’ गाडगीळांनी यावर न राहवून हुश्श केले. यावर भीमसेन जोशी त्यांना म्हणाले, “घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल, पण मांडीला खरचटणार नाही..”
भीमसेन जोशी यांना कारची आवड होतीच आणि जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे स्वतः गाडी चालवत ते जायचे. संपूर्ण भारत त्यांनी गाडी चालवत त्या काळी पालथे घातले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भीमसेन जोशींचे भारतभर कार्यक्रम होण्यास सुरू झाले होते. अनेकवेळा तर सलग 2 दिवस गाडी चालवून लगेच मैफिलीत गायलाही बसायचे आणि लगेच तिथून निघून गाडी चालवत दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाला हजर असायचे. थकवा आणि मरगळ हे शब्दच जणू त्यांच्या शब्दकोशात नव्हते.
भीमसेन जोशींना चंबलच्या डाकूंनी आडवले…
पंडितजींचा एक किस्सा तर फारच भन्नाट आहे. भीमसेन जोशींना प्रवासात असताना एकदा चंबलच्या डाकूने अडवले होते. झाले असे की, तो काळ होता 60 च्या दशकाचा. दिल्लीत भीमसेन जोशी गाण्यासाठी गेले होते. दिल्लीची मैफल संपवून ते मुंबईकडे परत निघाले होते. सवयीनुसारच पंडितजी गाडी चालवत होते. ग्वाल्हेर आल्यावर एका पेट्रोल पंपावर ते थांबले. तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. तेव्हा पेट्रोल पंपवाल्यांनी विचारले, ‘तुम्ही कुठे चालला आहात?’ त्यावर सांगितले की आम्ही मुंबईकडे निघालो आहोत. तेव्हा पेट्रोल वाल्याने सांगितले की आता पुढे जाऊ नका. कारण पुढे चंबळच्या खोऱ्यात खतरनाक इब्राहीम डाकूचा एरिया आहे. तो कोणालाही जीवंत सोडत नाही. आज इथेच मुक्काम करा आणि पहाटे निघा. त्यावर भीमसेन म्हणाले, “आम्ही गाणे बजावणे करणारे, आम्हाला कोण काय करणार?” अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकतील ते भीमसेन कसले?
पुढे गेल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास चंबळच्या खोऱ्यात दरोडेखोरांची टोळीच उभी राहिली. प्रत्येकाच्या हातात बंदुका होत्या. त्यांचे चेहरे मफलरने झाकले होते. त्यांनी गाडी अडवली आणि डिक्की उघडायला लावली. भीमसेन जोशी यांनी उघडली. तिथे वाद्य ठेवलेली होती. वाद्याची झिप उघडायला सांगितली. तिथे हार्मोनियम, तबला, ढोलकी अशी वाद्य होती. त्यावर त्या डाकूंचा मुखिया म्हणाला, “आप तो कोई गाणे बजाने वाले कलाकार लगते है.” त्यावर आप्पा जळगावकर म्हणाले, “जी हां” त्यावर मुखिया ने विचारले, “कौन है गाने वाला?” तेव्हा त्यांनी पंडितजींकडे बोट दाखवून सांगितले, “भीमसेन जोशी!” ते नाव ऐकल्यावर त्या डाकूने लोटांगण घातले आणि म्हणाला, “भाईसाब, गलती हो गयी. आप तो माता सरस्वती के भक्त हो.” असे म्हणून सन्मानाने त्यांनी त्यांना पाठवून दिले. भीमसेनजी ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर हसले आणि म्हणाले, “मी म्हणालो होतो ना. डाकू आम्हाला काय करणार?” भीमसेन जोशी यांचे नाव तेव्हा कॅसेट आणि रेडिओच्या रूपाने त्या डाकूपर्यंत देखील पोहोचले होते आणि त्यातूनच त्यांनी त्यांची सुटका केली, असा किस्सा आप्पा जळगावकर यांनी सांगितला. आप्पा जळगावकर भीमसेन जोशींच्या सोबत हार्मोनियमच्या साथीसाठी नेहमी असायचे.

पंडित भीमसेन जोशींची कीर्ती आता जगभर पसरली होती. त्यांचे भारतात मैफिली तर होत होत्याच, परदेशातही त्यांच्या मैफिली चांगल्याच गाजल्या. भीमसेन जोशी हे लखनऊआकाशवाणी केंद्राचे मान्यताप्राप्त कलाकार झाले होते. या काळात त्यांना थिरकवाजींचा तबला मनसोक्त ऐकायला मिळाला. बिस्मिल्लाह खान यांच्याशी तर अगदी मैत्रीचे नाते तयार झाले होते. भीमसेन जोशी यांच्या गायकीचे वैशिष्ट्य म्हणजे आक्रमकता, अधिक गतिमान आणि पहिल्या सुरापासून पकड घेणारी होती.
नाटक चित्रपटातील योगदान
भीमसेन जोशी यांनी अनेक नाटक तसेच चित्रपटांमध्येही मोठे योगदान दिले आहे. ‘धन्य ते गायनीकळा’ ह्या नाटकाचे त्यांनी संगीत-दिग्दर्शन केले (1968). गुळाचा गणपती, बसंतबहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे ह्या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. संतवाणी हा अभंगांचा व रंगवाणी हा नाट्यगीतांचा खास आविष्कार, बालमुरलीकृष्णन् ह्या दाक्षिणात्य संगीततज्ज्ञाबरोबरची जुगलबंदी, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतचे ध्वनिमुद्रण, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात (1997) संसदेत सादर केलेले वंदे मातरम्, मिले सूर मेरा तुम्हारा ह्या राष्ट्रैक्याच्या बहुभाषिक गीतातील प्रमुख सहभाग ही त्यांची मैफलींशिवायची गानविविधता आहे.

पुण्यातील रामेश्वर राममंदिरातर्फे भीमसेन जोशींना ‘पंडित’ या उपाधीने 1954 साली सन्मानित करण्यात आले, तर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे ‘गायनाचार्य’ उपाधी मिळाली. भीमसेन जोशी यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे, पद्मश्री (1972), पद्मभूषण (1985), पद्मविभूषण (1999) ह्या व 2008 मध्ये ‘भारतरत्न’ ह्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्यांव्यतिरिक्त संगीतरत्न (1971), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (1976) इत्यादी सन्मान त्यांना लाभले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी त्यांना सन्मान्य डी. लिट पदवी प्रदान केली.
अभंगांच्या नव्या पर्वाचा उदय
पंडित भीमसेन जोशी यांनी ‘संतवाणी’च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना एक सुखाद धक्का दिला. संगीतकार राम फाटक यांनी ‘स्वरचित्र’ उपक्रमाद्वारे पंडितजींकडून संतवाणी गाऊन घेतली आणि तिथूनच भावस्पर्शी अभंगांच्या एका नव्या पर्वाचा उदय झाला. ‘ज्ञानियाचा राजा’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ आणि ‘रूप पाहता लोचनी’, ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘टाळ बोले चिपळीला’, ‘बिजलीचा टाळ नभाचा मृदंग’ यांसारख्या शेकडो अजरामर रचनांमुळे त्यांच्या प्रत्येक मैफलीत संतवाणीचा आग्रह होऊ लागला. 1968 पासून लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या या भक्तिपर गीतांनी विक्रीचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, आजही ‘संतवाणी’च्या ध्वनिमुद्रिका रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसेच भीमसेन जोशी यांना ख्यालगायकीचा राजा म्हणून ओळखले जाते.

गुरुजींच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात
1952 मध्ये सवाई गंधर्वांच्या निधनानंतर, त्यांचे जावई नानासाहेब देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांनी 1953 मध्ये पुण्यात ‘सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवली. काळाच्या ओघात या महोत्सवाचे रूपांतर एका राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित सोहळ्यात झाले असून, नामवंत दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणासह पंडितजींच्या गायनाने या महोत्सवाची सांगता होणे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.
पंडित भीमसेन जोशी यांचा असा विश्वास होता की, खरा कलाकार तोच असतो जो कौतुकासाठी प्रेक्षकांकडे पाहत नाही, तर आधी स्वतःच्या सादरीकरणाचा आनंद घेतो आणि नंतर प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा विचार करतो. जर एखादा कलाकार आपल्या सर्जनशील प्रयत्नाने समाधानी असेल, तर त्याला खात्री बाळगता येते की प्रेक्षकही त्याच्या संगीताचे कौतुक करतील.

भीमसेन जोशी, मुलगा राघवेंद्र आणि पहिली पत्नी सुनंदा जोशी
भीमसेन जोशींचे वैवाहिक जीवन
पंडित भीमसेन जोशी यांचे दोन विवाह झाले होते. पहिले लग्न त्यांच्या मामे बहीण असलेल्या सुनंदा यांच्याशी झाला, तर दुसरा विवाह नाटकाच्या निमित्ताने आयुष्यात आलेल्या वत्सला यांच्याशी झाला. दुसरे लग्न झाल्यानंतर पहिल्या पत्नीकडे तसेच पहिल्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांकडे भीमसेन जोशींचे काहीसे दुर्लक्षच झाले. पुण्यात वास्तव्यास असताना भीमसेन जोशी त्यांच्या दुसरी पत्नीसह व मुलांसह मोठ्या बंगल्यात राहायचे. तर तिथेच त्यांची पहिली पत्नी व पहिल्या पत्नीची मुले वाड्यात एका खोलीत राहत होते. पहिल्या पत्नीवर आपण मोठा अन्याय केला आहे, याचा गंड मनात असल्याने भीमसेन जोशी पहिल्या कुटुंबाला जमेल तशी मदत करत असत. भीमसेन जोशी यांचे पहिले पुत्र राघवेंद्र यांनी त्यांच्या पुस्तकात याविषयी सविस्तर लिहिले आहे.

भीमसेन जोशी आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी वत्सला

स्वरभास्कर कायमचा मावळला
वत्सला बाईंच्या मृत्यूनंतर भीमसेन जोशी एकाकी राहायला लागले होते. तसेच त्यांच्यावर नऊ शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. वृद्धापकाळाने त्यांची प्रकृती देखील काहीशी अस्वस्थ होती. भरलेल्या संगीत दरबारात अचानक सतारची तार तुटावी आणि सर्वत्र गंभीर वातावरण व्हावे, अगदी तसे 24 जानेवारी 2011 रोजी झाले. भीमसेन जोशी यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले आणि स्वरभास्कर कायमचा मावळला. परंतु, त्या भास्कराचे सूर अजूनही अजरामर आहेत आणि राहतील.
