महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ३७.५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर आज सेवानिवृत्त झाल्या. मुंबईतील नायगाव पोलिस मैदानावर आयोजित एका सोहळ्यात त्यांना निवृत्तीनिमित्त ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना देण्यात आली. १
.
सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रश्मी शुक्ला सर्वांचे आभार मानले. “गेली दोन वर्षे महाराष्ट्र पोलिसांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. या काळात राज्यातील सण-उत्सव शांततेत पार पडले आणि निवडणुकाही विनाअडथळा पार पडल्या. विशेषतः गडचिरोली आणि गोंदियातील नक्षलग्रस्त भागांत झालेली सुधारणा आणि नक्षलवाद्यांच्या संख्येत झालेली घट, हे संपूर्ण पोलिस दलाचे यश आहे,” असे त्या म्हणाल्या.

शुक्ला यांची वादग्रस्त कारकिर्द
रश्मी शुक्ला यांची कारकीर्द काही वादांनीही गाजली. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यातील सत्तापालटानंतर त्यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यात आले. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधीपक्षांनी रश्मी शुक्ला यांच्यावर पक्षपाताचे आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांची बदलीही केली होती. पण नंतर महायुतीचे सरकार आल्यावर त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वर्णी लावण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गौरव
सेवानिवृत्तीनंतर रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करताना म्हटले की, “राज्याची कायदा-सुव्यवस्था राखण्यात रश्मी शुक्ला यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. प्रशासकीय सेवेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव राज्यासाठी मोलाचा ठरला.”
नवे पोलिस प्रमुख सदानंद दाते यांचा परिचय
रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची धुरा आता सदानंद दाते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते १९९० च्या बॅचचे अत्यंत डॅशिंग अधिकारी मानले जातात. २००८ च्या २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी दाते यांनी कामा रुग्णालयात दहशतवाद्यांशी थेट मुकाबला करत अतुलनीय शौर्य गाजवले होते. सदानंद दाते यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) प्रमुख, महाराष्ट्र एटीएस (ATS) प्रमुख आणि मुंबईचे सहपोलिस आयुक्त (गुन्हे) म्हणून सक्षमपणे जबाबदारी सांभाळली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तपासाचे नेतृत्वही त्यांनी केले होते. सदानंद दाते यांचा पोलिस महासंचालक पदाचा कार्यकाळ डिसेंबर २०२७ पर्यंत असणार आहे.
महाराष्ट्र पोलिस दलाच्या प्रमुखपदी सदानंद दाते यांची नियुक्ती होत असताना राज्यासमोर कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने, सायबर गुन्हे, दहशतवादविरोधी सज्जता आणि पोलिस दलाचे आधुनिकीकरण यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. एनआयएच्या नेतृत्वाचा अनुभव, प्रशासकीय कौशल्य आणि मैदानावरील प्रत्यक्ष कारवाईचा अनुभव यामुळे दाते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलिस दल अधिक सक्षम आणि सज्ज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
