![]()
पुणे महानगरपालिका निवडणुकीत महापौर बनवताना शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. राज्याच्या राजकारणात प्रथमच शिवसेना १२० जागांवर निवडणूक लढवत असून, उमेदवारांचा आत्मविश्वास पाहता १६ जानेवारी रोजी निका
.
शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे, शहराध्यक्ष नाना भानगिरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, अजय भोसले, आबा बागुल, युवा नेते किरण साळी आणि रमेश कोंडे उपस्थित होते.
सामंत यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या विविध प्रश्नांमध्ये जातीने लक्ष घालून ते सोडवले आहेत. त्यामुळे पुणेकर शिवसेनेला पाठिंबा देतील. त्यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही टीकेला उत्तर देत बसू नये, कारण ते काम उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या करत आहेत, असेही सांगितले. काही पक्ष विकासाचे प्रश्न सोडून इतर टीकाटिप्पणी करत आहेत, असेही ते म्हणाले.
पुणे हे कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. काही लोकांना दुसऱ्या पक्षांना कमी लेखण्याची सवय आहे, पण वस्तुस्थिती तशी नाही. ही लढाई शिवशक्ती, श्रमशक्ती विरोधात धनशक्ती अशी आहे. शिवसैनिक संघर्षातून अनेक गोष्टी शिकलेला आहे आणि संघर्ष सेनेच्या पाचवीला पुजलेला आहे, त्यातूनच मोठे काम उभे राहते, असा इतिहास आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
उमेदवारांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करावा आणि पुणेकरांना ठामपणे सांगावे की, त्यांच्या अडचणी शिवसेना सोडवणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत आपण लढत असून कमकुवत नाही हे दाखवून दिले आहे, असे आवाहन त्यांनी केले.
भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती असून ती झाली पाहिजे, असा आमचा आग्रह होता. जर आधी तयारी केली असती तर आम्ही १६५ जागांवर उमेदवार उभे करू शकलो असतो. काही ठिकाणी आता उमेदवार नसले तरी आगामी निवडणुकीत १२० जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. शिवसेनेची खरी ताकद उमेदवारांनी दाखवून दिली पाहिजे, असे सामंत म्हणाले.
आमच्याकडे एक नगरसेवक असला तरी त्याचे १५० नगरसेवक कसे करावयाचे हे एकनाथ शिंदे यांना चांगल्याप्रकारे माहिती आहे. कार्यकर्त्यांनी युगपक्षाची जबाबदारी आपली समजून आगामी काळात काम करावे. मनपा इतर सर्व पक्षांच्या ताब्यात होती, परंतु आता मनपा सेनेच्या ताब्यात आली पाहिजे, असेही सामंत यांनी शेवटी नमूद केले.
