![]()
“आज सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी १५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. मात्र, एक काळ असा होता की याच नायगावमध्ये सावित्रीबाईंचे घर उभारण्यासाठी आम्हाला २५-३० लाख रुपयांसाठीही सरकारी नियमांचा आणि परवानगीचा मोठा संघर्ष करावा लागला होता. पण आता
.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत स्मारकाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रकृती ठीक नसल्याने छगन भुजबळ मागील काही महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. मात्र, आज डॉक्टरांची परवानगी घेऊन भुजबळ या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले.
नायगावात सावित्रीबाईंचे घरबांधणीचा किस्सा
छगन भुजबळ यांनी १९९३ मधील आठवण सांगताना म्हटले की, “सावित्रीबाई फुले यांची आज १९५ वी जयंती आहे. आज आपण एवढा मोठा कार्यक्रम केला. येथे मोठे स्मारक उभे होत आहे. पण २५-३० वर्षांपूर्वी १९९३ मध्ये राष्ट्रपतींनी फुले वाड्याचे लोकार्पण केल्यानंतर हरिभाऊ नरके माझ्याकडे आले. नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. तिथे आपण काहीतरी केले पाहिजे. मी त्यांना सांगितले की, कुठे काय आहे ते जाऊन बघा. ते तिथे गेले आणि घर बघितले. नंतर मी आलो. सगळ्या लोकांना येथे सावित्रीबाईंचा जन्म झाल्याचे सांगितले.
आता इतर घरांप्रमाणे ते घर देखील निर्माण झाले पाहिजे. त्यानुसार कामाला लागतो. पैशांचा प्रश्न आला. त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो. पण एमएलसी होते. तेव्हा वर्षाला ४० ते ५० लाख रुपये मिळत असतील. त्यातलेही काही खर्च झाले होते. याशिवाय ते पैसे खर्च करण्यासाठी नियम फार होते.
चंद्रअय्यंगार नावाचा अर्थसचिव होता. तो म्हणाला आपण हे करायचे, मी तुम्हाला परवानग्या मिळवून देतो. त्यानंतर कामाला सुरुवात झाली आणि सावित्रीबाईंचे घर उभे राहिले. शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सावित्रीबाईंच्या नवीन बांधलेल्या घराचे उद्घाटन केले, असा किस्सा छगन भुजबळ यांनी सांगितला.”
देवा देता तो छप्पर फाडके देता है
छगन पुढे भुजबळ म्हणाले, हा किस्सा सांगण्याचा उद्देश एवढाच की, त्यावेळी २५-३० लाख रुपयाला सुद्धा आम्हाला अडचण येत होती. पण आता दीडशे कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले. देवा देता तो छप्पर फाडके देता है. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने शाहू-फुले-आंबेडकरांच्या अनुयायांच्या वतीने मी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे आभार मानतो, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
महात्मा फुलेंची २०० वी जयंती
पुण्यातील फुलेवाड्याचे काम रेंगाळलेले आहे. त्याला गती द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट ११ एप्रिल २०२७ रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची २०० वी जयंती आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंची २०० जयंती आम्ही देशभरात साजरी करणार असल्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधानांनी जाहीर केले म्हटल्यावर राज्य सरकारही त्याबाबत हालचाल करेल, अशी आशा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
नायगावच्या नामांतराची मागणी
नायगावचे नाव क्रांतीज्योती सावित्रीनगर ठेवा, अशा मागणीचे कुणीतरी पत्र मला आणून दिले. आमच्या सगळ्यांचीच विनंती आहे की, त्याबाबत कार्यवाही करावी. बाकीचे मंत्री त्याला पाठिंबा देतील, याची मला खात्री आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.
