![]()
बंगाल पोलिसांनी सोमवारी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीची ओळख आनंद सरदार अशी झाली आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला शहरातील बाजारपेठेतून पकडले. या अटकेसह प्रस्तुत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी 6 लोकांची एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. मृत मुलगी 4 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. पोलीस तपासात हे देखील समोर आले आहे की, ती चिमुकली मैत्रिणीसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती. मुलगी घरी परतली नाही, तेव्हा कुटुंबीयांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. नंतर रविवारी तिचा मृतदेह सूर्यपूर हाट परिसरातील तलावात सापडला. तिच्या डोक्यावर जखमांच्या खुणा होत्या. शवविच्छेदनातून हे देखील समोर आले आहे की, आरोपींनी बलात्कारानंतर तिला जिवंतपणीच तलावात फेकले होते. तिच्या फुफ्फुसात आणि पोटात पाणी आढळले. बुडाल्याने आणि जास्त रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. बारुईपूर बलात्कार-हत्या प्रकरणी राजकारण सुरूच: ममतांच्या घराजवळ कडेकोट बंदोबस्त या घटनेवरून राजकीय वादही पेटला आहे. तृणमूल काँग्रेसने आरोप केला की, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पीडित कुटुंबाला भेटण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजपने ही नियमित सुरक्षा व्यवस्था म्हटले आहे. एका आरोपीला जमावाने ठार केले यापूर्वी रविवारी मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर लगेचच, जमावाने एका व्यक्तीला मारहाण करून ठार केले. त्याच्यावर मुलीच्या बलात्कार आणि हत्येमध्ये सहभाग असल्याचा संशय होता. त्याची ओळख इंद्रजीत तांती अशी पटली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली. त्यात मुलीला चार लोक घेऊन जाताना दिसले आहेत. पोलीस या चौघांची ओळख पटवण्यासाठी कामाला लागले आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक शवविच्छेदनात मुलीच्या गुप्तांगांवर जखमांचे आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर ओरखडे व चावल्याचे निशाण आढळले आहेत. मुलीच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने वार करण्यात आला असावा किंवा तिला एखाद्या कठीण पृष्ठभागावर आपटण्यात आले होते. तपासात हे देखील समोर आले की, डोक्याच्या दुखापतीमुळे झालेला रक्तस्त्राव आणि बुडल्यामुळे तिचा मृत्यू झाला. एनसीडब्ल्यूने एका आठवड्यात अहवाल मागवला राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) सोमवारी बंगालचे डीजीपी सिद्धार्थ नाथ गुप्ता यांच्याकडून एका आठवड्याच्या आत सविस्तर कृती अहवाल (एटीआर) मागवला आहे. आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, एटीआरमध्ये केवळ या भयानक गुन्ह्याची माहिती नसावी, तर त्यानंतर झालेल्या जमावाच्या हिंसाचाराच्या घटनांचाही उल्लेख असावा, ज्यात गुन्ह्यात सामील असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला मारहाण करून ठार मारण्यात आले, केंद्रीय दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला आणि पोलिसांच्या गाड्यांना आग लावण्यात आली.
बंगाल गँगरेप मर्डर – मुख्य आरोपीसह 3 जणांना बेड्या:बारुईपूरमध्ये जिवंत मुलीला तलावात फेकले होते; शवविच्छेदन अहवालात दावा – फुफ्फुसे, पोटात पाणी आढळले
