The need for active hands to remove social darkness | सामाजिक अंधार दूर करण्यासाठी कृतीशील हातांची गरज: डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे चिदानंद फाउंडेशन कार्यक्रमात मत – Pune News



सामाजिक क्षेत्रातील अंधार दूर करण्यासाठी कृतीशील हातांची गरज आहे, असे मत अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘चिदानंद फाउंडेशन’च्या दुसऱ्या वर्षाच्या देणगी प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत

.

हा कार्यक्रम भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर, ‘चिदानंद फाउंडेशन’ पुणेचे संचालक चिंतामणी वैजापूरकर आणि संचालिका नेहा चिंतामणी वैजापूरकर उपस्थित होते.

या प्रसंगी स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, उमेद परिवारचे राकेश सणस आणि सेवा सहयोग फाउंडेशन संचलित चेतना संस्थेच्या अनिता घाटणेकर यांना देणगीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

डॉ. गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले की, समाजात अनेक जटिल प्रश्न असून केवळ एक संस्था ते सोडवू शकत नाही. सक्षम संस्था आणि कार्यकर्ते यांच्या एकत्रिकरणातूनच हे प्रश्न सोडवता येतात. सामाजिक जाणीवा बाळगून काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या मागे उभे राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

ते म्हणाले की, १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सामाजिक संवेदनशीलता आणि जागरूकता बाळगणारे नागरिक किती आहेत, हा प्रश्नच आहे. ‘सिव्हिल सोसायटी’ कमी होत जाणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी धोक्याचे लक्षण आहे. कोणताही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी केवळ शासन किंवा समाजातील प्रभावी व्यक्तींवर विसंबून राहणे पुरेसे ठरणार नाही.

डॉ. कुलकर्णी यांनी युनेस्कोच्या अहवालाचा संदर्भ देत सांगितले की, महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये आजही बालविवाहासारखा सामाजिक प्रश्न अस्तित्वात आहे. जुने सामाजिक प्रश्न नव्या रूपाने पुढे येत असून, काळानुरूप नवीन प्रश्नही निर्माण होत आहेत. त्यामुळे समाज पुन्हा त्याच टप्प्यावर येऊन थांबला आहे की काय, अशी शंका येते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पंडित विजय कोपरकर म्हणाले की, एकीकडे हव्यासापोटी धावपळ करणारा समाज पाहिला की त्यांची कीव करावीशी वाटते. लाखो रुपयांचे पॅकेज मिळूनही त्यांच्या मनात समाधानाची वृत्ती नसते. स्वतःच्या मुलांकडे लक्ष न देणाऱ्या अशा पालकांकडे पाहिले असता, सामाजिक समस्यांकडे ते कोणत्या संवेदनशीलतेने पाहतील, हा चिंतनाचाच विषय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *