राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर आता कोकाटे यांचे खाते हे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आता हे खाते कोणाकडे दिले जाणार याचा निर्णय हा अजित पवार यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे क्रीडा खाते कोणाकडे दिले जाणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

नाशिक सत्र न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. ऐन निवडणुकीत कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
माणिकराव कोकाटे हे वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी विधीमंडळाच्या सभागृहात चक्क मोबाईलवर ‘रम्मी’ गेम खेळल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा राजीनामा न घेता केवळ खातेबदल करण्यात आला होता, ज्यामुळे त्यांना आपले तत्कालीन कृषी मंत्रिपद गमवावे लागले होते.
सरकारच्या प्रतिमेच्या दृष्टीने योग्य निर्णय – प्रवीण दरेकर
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले, मला वाटते की कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल तर सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेच्या दृष्टीने हे त्याठिकाणी योग्य आहे. आता टप्प्या टप्प्याने सरकार भूमिका घेईल. सरकारचे अभिनंदन केले पाहिजे कारण लोकांच्या मनात किंवा कोर्टाने एखादा निर्णय घेतल्यावर तात्काळ दखल घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचे काम केले – अंबादास दानवे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फार मोठे असे काही काम केले नाही. त्यांनी माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. ज्या वैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होते तेव्हा त्याच्याकडील पद तातडीने काढावे लागते. राहुल गांधी यांना देखील मागच्या वेळी अशीच शिक्षा सुनावली होती आणि त्यांचे 24 तासांत लोकसभेचे सदस्यपद काढून टाकले होते.
ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत
