जवळा देशमुख येथे पाचवी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न


शिक्षण परिषदेतील चर्चासत्रांना शिक्षकांचा प्रतिसाद; बाल सुरक्षेसाठी विविध विषयांवर घडून आले विचारमंथन

नांदेड- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने निर्देशित   लोहा तालुक्यातील समुह साधन केंद्र शेवडी बाजीरावची पाचवी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा देशमुख येथे  अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्रसमन्वयक एस. आर. गायकवाड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर, केंद्रीय मुख्याध्यापक संतोष साखरे, विषयतज्ज्ञ किरणकुमार बायकेवार, सरपंच प्रतिनिधी ग्यानोबा पावडे, माजी सरपंच कमलताई शिखरे, पिंपरणवाडीचे मुख्याध्यापक ज्ञानोबा मोरे, जवळाचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे आदींची उपस्थिती होती.

             शिक्षण परिषदेच्या प्रारंभी ‘नमस्कार माझा’ हे विद्यार्थ्यांनी कृतियुक्त गीत सादरीकरण करून ज्ञानमंदिरास आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, धूप पूजन आणि दीप प्रज्वलन करून अभिवादन केले. तसेच शालेय उपक्रमांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन झाल्यानंतर शिक्षण परिषदेस रितसर प्रारंभ झाला. मान्यवरांच्या यथोचित सत्कारानंतर विद्यार्थीनींनी स्वागत गीत गाऊन शब्द सुमनाने स्वागत केले. शिक्षण परिषदेत सकारात्मक शिस्त, बाल सुरक्षा, डॉ. जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम आणि त्यापुढील निर्देश तसेच माता पालक गट यां विषयावर सुलभक श्रीमती कलेटवार के.जी., श्रीमती सोनटक्के जे. एस., श्रीमती तेलंग एन. एस. यांनी सखोल मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जवळा शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष घटकार यांनी तर आभार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले यांनी केले. दरम्यान, मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशासकीय सूचना देण्यात आल्या. तसेच विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर यांना बदली झाल्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला. सुग्रास भोजनाने शिक्षण परिषदेची सांगता झाली. परिषदेच्या यशस्वी संयोजनासाठी उमाकांत बेंबडे, साहेब शिखरे,मारोती चक्रधर, मनिषा गच्चे, पांडुरंग गच्चे,चाँद शेख, मंचक शिखरे, राजू शिखरे, बालाजी पांचाळ, कैलास गोडबोले, आनंदा गोडबोले, विनोद गोडबोले, हरिदास पांचाळ, भैय्यासाहेब गोडबोले, बालासाहेब शिखरे आदींनी परिश्रम घेतले.

Post Views: 9






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *