मनी बहिण पटेलची डायरी आणि राजनाथ सिंहची ‘कथा-कल्पना  


काल मात्र काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावरच त्यांना अडवून दोन कागद हातात दिले आणि ठामपणे सांगितले की, “ही घ्या, मनी बेन पटेल यांची मूळ डायरी.” तेव्हा राजनाथ सिंह अगदी निश्चयीपणे म्हणाले “मला गुजराती वाचता येत नाही.”

पण आश्चर्य पहा! ज्याची भाषा वाचता येत नाही, त्या तेच गुजराती मजकुराचा आधार घेऊन त्यांनी आधी नेहरूंवर खोटा आरोप करण्याचा पराक्रम करून ठेवला होता. म्हणजे त्यांच्या वक्तव्याचा पाया कागदावर नव्हे, तर हवेतच बांधलेला होता,हे आता ताठ उघड झाले आहे.

राजनाथ सिंह यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला, प्राध्यापक म्हणून प्रतिष्ठित नोकरीही केली, आणि राजकारणात ते स्वच्छ प्रतिमेचे मानले जात होते. नितीन गडकरी हे त्याच स्वच्छ प्रतिमेच्या क्लबमधील दुसरे नाव. पण गेल्या काही वर्षांपासून राजनाथ सिंह यांनी स्वतःमध्ये असा “बदल” केला आहे की, आता त्यांच्या वक्तव्यांचा भार उचलायला तथ्येही नकार देतात.अनेक दावे असे–ज्यांना आधार नाही, आणि ज्यांनी त्यांचीच प्रतिष्ठा ढासळली आहे,उजळली नाही.

मनी बेन पटेल या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या थोरल्या कन्या त्यांच्या नावाचा आधार घेवून इतिहासाचे पाय मोडण्याचे उद्योग करणे, तेही राजनाथ सिंह सारख्या प्रगल्भ व्यक्तीने, म्हणजे खरंच आश्चर्याचा विषय.

पत्रकार आशिष चित्रांशी आणि हेमंत अत्री सांगत होते की, सिंह यांचे राजकीय ‘दु:ख’ म्हणजे त्यांना स्वतःच्या मुलाला राजकारणात प्रस्थापित करता आले नाही. एकेकाळी देशाचे गृहमंत्री,म्हणजे सत्ता क्रमवारीतील नंबर दोन,आज संरक्षण खात्यावर ‘पाडण्यात’ आले. (यात रक्षाबंधनाचा काही संबंध नाही पण नाव मात्र राजनाथ सिंह यांनीच सणासारखा वापरला.)

पंडित नेहरू हे कोणत्याही धर्माचे कट्टर समर्थक किंवा विरोधक नव्हते हे ऐतिहासिक सत्य नाकारणे अशक्य आहे. पण मागील काही वर्षांत भाजप आणि त्यांच्या प्रचारकांनी नेहरूंची बदनामी करण्याचा ध्यासच घेतला आहे. तरीही नेहरूंच्या उंचीला कमी करता येईल अशी कोणाची भ्रांत आजवर खरी ठरलेली नाही.

सोमनाथ मंदिराच्या बाबतीतही तथ्य स्वच्छ आहे. लोह पुरुष सरदार पटेल यांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव दिला तेव्हा नेहरूंनी स्पष्ट सांगितले: “शासकीय पैसा वापरू नका; हे जनतेच्या श्रद्धेचे काम आहे आणि ते जनतेच्या पैशातूनच व्हावे.”
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद सोमनाथच्या कार्यक्रमाला जाणार होते, पण नेहरूंनी सूचित केले की सरकारची सर्वोच्च मंडळी एका विशिष्ट धर्माच्या बाजूची दिसू नयेत कारण देश धर्मनिरपेक्ष आहे. 
दुसरीकडे आपले वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ते तर वर्षभरात असंख्य धार्मिक फोटोशूट, व्हिडिओ, समुद्राखाली ध्यान आणि तंत्रज्ञानाद्वारे घेतलेली दृश्ये यांचे अखंड प्रदर्शन करत असतात.

राजनाथ सिंह यांचे वय 75 पूर्ण व्हायला आता आठ महिने उरले आहेत आणि मार्गदर्शन मंडळात जागा रिकामीच आहे. त्यामुळे कदाचितच त्यांनी गुजरातमध्ये ते भाषण दिले. ज्यात त्यांनी नेहरूंवर आरोप केला की “ते मशीद बांधण्यासाठी सरकारी खजाना वापरणार होते.” स्पष्ट आहे हे भाषण गुजराती लॉबीला खुश करण्याचा राजकीय हिशेब होता. त्यात तथ्याचा अंश नव्हताच.

काँग्रेसच्या विरोधात असले तरी पंडित नेहरू यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना मंत्रिमंडळात घेतले होते. आणि आज त्या नेहरूंनाच शिव्याशाप देणे सत्ताधाऱ्यांचे दैनंदिन काम झाले आहे.नेहरू इतके उदार होते की तरुण अटल बिहारीजी वाजपेयी यांना ते म्हणाले होते “भविष्यात एकदा पंतप्रधान होशील.” आणि त्यांची ती भविष्यवाणी अचूक ठरली.

बंगाल निवडणुकीत मोदींनी रवींद्रनाथ टागोर यांचे मुखवटे लावून प्रचार केला तो उपयोगी पडला नाही. आज तेच टागोरही प्रश्नचिन्हाखाली.वंदे मातरम आणि जनगणमन या विषयावरही नेहरूंची भूमिका स्वच्छ होती. जनगणमन हे संगीताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर वाजवता येण्यास योग्य; वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणून इतिहासाचा गौरव करणारे.हे त्यांनी स्वतः लेखी नोंदवून ठेवले होते.

अखेरीस एकच गोष्ट ठळकपणे: राजनाथ सिंह यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल खोटे पसरवून स्वतःचीच प्रतिमा घसरवू नये.
इतिहासाच्या पाया खोदून कोणीही उंच इमारत उभं करू शकत नाही,हे त्यांना समजायला हवे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *