नितेश राणेंचा मास्टरस्ट्रोक? कोकणात राजकीय भूकंप; ठाकरे गटाच्या उमेदवाराची माघार:NCP चे अनिकेत तटकरेंचा मार्ग मोकळा

0
730-x-548-new-2026-06-04t130216210_1780559750.jpg




राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोकण विभागात मोठी राजकीय घडामोड घडली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलले आहे. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्यापूर्वी बाळ माने हे भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. या वेळी त्यांनी संख्याबळ नसल्याने आपण माघार घेत असल्याचे प्रसाद माध्यमांशी बोलताना सांगितीले. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून कोकणातील विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत अपेक्षित मानली जात होती. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने बाळ माने यांना रिंगणात उतरवले होते. दोन्ही बाजूंनी मतदारांशी संपर्क आणि निवडणुकीची तयारी सुरू होती. त्यामुळे या मतदारसंघात थेट सामना रंगेल, असे चित्र होते. मात्र, अंतिम क्षणी बाळ माने यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ही निवडणूक प्रत्यक्ष मतदानापूर्वीच एकतर्फी झाली आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर कोकणातील विधान परिषद निवडणुकीत केवळ अनिकेत तटकरे हेच प्रमुख उमेदवार उरले आहेत. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीची प्रक्रिया जवळपास निश्चित मानली जात आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर महाविकास आघाडीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात घडलेल्या या बदलामुळे कोकणातील राजकीय समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे. बाळ माने यांचा राजकीय प्रवासही चर्चेचा विषय ठरत आहे. ते यापूर्वी भाजपमध्ये सक्रिय होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर विश्वास दाखवत विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर त्यांनी अर्ज मागे घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. महायुतीचे वर्चस्व स्पष्ट कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहिले तर महायुतीचे वर्चस्व स्पष्ट दिसून येते. या मतदारसंघातील एकूण 831 मतदारांपैकी शिवसेना शिंदे गटाकडे 236 सदस्यांचे संख्याबळ आहे. भाजपकडे 151, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 63 सदस्य आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडे 55, तर काँग्रेसकडे 50 सदस्य आहेत. या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बाजू आधीपासूनच मजबूत मानली जात होती. आता बाळ माने यांच्या माघारीनंतर अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून कोकणातील विधान परिषद निवडणूक मतदानाशिवायच निकालाच्या दिशेने गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *