जल संवर्धनासाठी ‘युवा जलदिंडी'; खानापूर येथून अभियानाचा शुभारंभ:युवा भारत केंद्र, युनिसेफ, यशदा आणि साने गुरुजी मंडळाद्वारे आयोजन
![]()
वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व व जल साठ्यांचे जतन काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने केंद्रीय युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय, ””मेरा युवा भारत केंद्र”” अकोला, युनीसेफ़ महाराष्ट्र, ‘यशदा’ जलसाक्षरता केंद्र आणि साने गुरुजी कला, सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ””युवा जल दिंडी अभियान”” सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ‘जलसंवर्धनासाठी युवा व समुदायाचा सहभाग’ या विषयावर पातूर तालुक्यातील खानापूर येथून १ जून रोजी दुपारी या मोहिमेचा शानदार शुभारंभ करण्यात आला. मेरा युवा भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अक्षय निपाणे यांच्या मार्गदर्शनात व साने गुरुजी मंडळाचे व्यवस्थापक विशाल राखोंडे यांच्या नेतृत्वात गावागावांत पाण्याचे महत्त्व पोहोचवण्यासाठी तरुणांची फौज सज्ज झाली आहे. या मोहिमेत स्व. विनायक राखोंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर राखोंडे, सुखदेव उपर्वट, सिद्धार्थ इंगळे, तरुणाई फाउंडेशनचे संदीप देशमुख यांच्यासह श्रावणी देशमुख, अर्पिता कथले, गोपाल आवटे आणि अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल राखोंडे यांनी केले, तर श्याम उगले यांनी आभार मानले. उपस्थितांनी जल शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. लोककला, पथनाट्यातून जनजागृती खानापूर गावाच्या सरपंच सुनीता सुधीर देशमुख यांनी जल दिंडी यात्रेला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचे उद्घाटन केले. यावेळी गावातील प्रमुख चौकांमध्ये तरुणांनी एकत्र येत लोककला आणि पथनाट्याच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन आणि पाणी बचतीचा संदेश दिला. वटेश्वर मंदिरात आयोजित मुख्य सोहळ्यात ग्रामस्थांशी थेट संवाद साधत जलसंवर्धनाचे माहितीपत्रक वाटण्यात आले.
