सरसगट कर्जमाफी अन् खतांच्या तुटवड्यावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक:जिंतूर-कनेरगाव नाका मार्गावर तब्बल दोन तास 'रस्ता रोको'!

0
whatsapp-image-2026-06-11-at-12746-pm_1781166664.jpeg




राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यावी, बियाणे, खतांचा तातडीने मुबलक पुरवठा करावा यासह इतर मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी ता. 11 सकाळी आकरा वाजता जिंतूर ते कनेरगावनाका मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे गोरेगाव मार्गे विदर्भात जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. राज्यात शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमुक्तीची घोषणा केली, मात्र सदर योजना फसवी असल्याचा आरोप क्रांतीकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या शिवाय बाजारपेठेत डीएपी खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. बियाणे व खते नसल्याने अनेक ठिकाणी जादा दराने खते खरेदी करावे लागत आहेत. या शिवाय घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचे हप्ते थकल्यामुळे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणेही कठीण झाले आहे. शासनाने सरसगट कर्जमाफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिंतूर ते कनेरगाव नाका मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी क्रांतीकारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, श्याम मते, विठ्ठल वायचाळ, सखाराम भाकरे, अशोक जयस्वाल, दामोदर घुमणार,बबन कांबळे, विशाल पोळ, राहुल कावरखे, मनोहर सावके, संदीप मानमोठे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नायब तहसीलदार सरोदे, कृषी विभागाचे गुण नियंत्रण अधिकारी काळे, सेनगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्या जाणून घेतल्या. या मागण्यां शासनाकडे कळविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यानंतर दोन तासांनी रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, जमादार अनिल भारती यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *