विधान परिषद निवडणूक:राज्यात 17 पैकी 5 जागी महायुतीचे पारडे जड; कुठे उमेदवार बाद, तर कुठे माघार, वाचा इलेक्शनची स्टोरी
![]()
राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून ‘महायुती’ विरुद्ध ‘महाविकास आघाडी’ (मविआ) असा थेट सामना रंगला आहे. बंडखोरी मोडून काढण्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच, अर्ज छाननी आणि नाट्यमय घडामोडींमुळे 4 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीचे पारडे प्रचंड जड झाले असून, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या संपत असली, तरी त्यापूर्वीच सोलापूर, यवतमाळ, अमरावती आणि नाशिकमधील चित्र स्पष्ट झाले आहे. 1. सोलापूर: ‘मविआ’चा मुख्य उमेदवारच बाद सोलापूरमध्ये महायुतीने राजेंद्र राऊत यांना मैदानात उतरवले आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर रिंगणात होते. मात्र, अर्ज छाननीच्या प्रक्रियेत फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरला आहे. यामुळे ‘मविआ’ला मोठा धक्का बसला असून आता त्यांना इतर कोणालातरी पाठिंबा द्यावा लागणार आहे. संख्याबळ: सोलापूरमधील ६१४ मतदारांपैकी महायुतीकडे तब्बल ४२८ मते आहेत, तर मविआकडे केवळ ८१ मते आहेत. त्यामुळे राजेंद्र राऊत यांचा विजय अतिशय सोपा झाला आहे. 2. यवतमाळ: संख्याबळाअभावी ‘मविआ’च्या उमेदवाराची माघार यवतमाळमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला, कारण त्यांचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला. पुरसे संख्याबळ पाठीशी नसल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संख्याबळ: या मतदारसंघातील एकूण ४४६ मतदारांपैकी मविआकडे फक्त १३१ मते होती. हा फरक लक्षात घेता कांबळे यांनी लढतीतून माघार घेणे पसंत केले. 3. अमरावती: भाजप बंडखोराचा अर्ज बाद अमरावतीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्याविरुद्ध भाजपचेच कार्यकर्ते विप्लव बजोरिया यांनी बंडखोरी करत अर्ज भरला होता. मात्र, मविआचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बजोरिया यांचा अर्ज बाद केला. या निर्णयाविरोधात बजोरिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. संख्याबळ: येथे एकूण ४४९ मतदारांपैकी महायुतीकडे २२२, तर मविआकडे १४८ मते आहेत. बंडखोरी टळल्यामुळे पोटे पाटील यांचा मार्ग सुकर झाला आहे. 4. नाशिक: मविआचा अधिकृत उमेदवारच नाही नाशिकची जागा महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली होती, परंतु पक्षाने येथे कोणताही उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे आता रिंगणातील अपक्षांपैकी मविआ कोणाला पाठिंबा देते, यावरच विरोधकांची गणिते अवलंबून राहतील. संख्याबळ: येथे एकूण ६०३ मतांपैकी महायुतीकडे ४५४ आमदारांचे भक्कम संख्याबळ आहे. परिणामी, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जात आहे. 5. कोकण: जुईली दळवींची माघार कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून एक मोठी आणि राजकीय घडामोडींनी प्रदीर्घ चाललेली नाट्यमय घडामोड समोर आली आहे. महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि बंडाचे निशाण अखेर थंडावले असून, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या माघारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर झाला आहे. महायुतीतील अंतर्गत वाद आणि तणाव तब्येतीचे कारण आणि अर्ज माघारी उमेदवारी अर्ज मागे घेताना भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे स्वतः उपस्थित होते. जुईली दळवी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या वतीने सूचक विघ्नेश माळी यांनी हा अर्ज मागे घेतल्याची माहिती विकास गोगावले यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पालकमंत्री पदाबाबत गोगावलेंचे वक्तव्य
