Mumbai Goa Highway | कोकणात जाणाऱ्यांना मोठा झटका! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ २ दिवसांसाठी प्रवेशबंदी
Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. आठवड्याच्या शेवटी आणि शालेय सुट्ट्यांमुळे कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असतानाच 5 आणि 6 जून रोजी रायगड जिल्ह्यात विशेष वाहतूक नियम लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत प्रवासाचे नियोजन करताना वाहनचालकांनी नव्या नियमांची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे.
यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड (Raigad Fort) येथे मोठ्या प्रमाणावर शिवभक्त उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लाखो भाविकांच्या गर्दीचा विचार करून रायगड जिल्हा प्रशासनाने विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा तसेच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
या नियोजनानुसार 5 जून रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून 6 जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा-नागोठणे ते कशेडी घाट या मार्गावर जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी लागू राहणार आहे. मागील काही आठवड्यांपासून पेण, वडखळ आणि खारपाडा टोलनाक्यांवर शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
Mumbai Goa Highway | पर्यायी मार्ग आणि अतिरिक्त निर्बंध :
सोहळ्यासाठी येणारी वाहने आणि नियमित वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन प्रशासनाने काही मार्गांवर विशेष निर्बंध लागू केले आहेत. माणगाव-निजामपूर-पाचाड-रायगड किल्ला, माणगाव-ढालघर फाटा-पाचाड-रायगड किल्ला तसेच महाड-नातेखिंड-पाचाड-रायगड किल्ला या मार्गांवर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. मात्र रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे (Kishan Jawale) यांनी जारी केले आहेत.
दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगड परिसरात सुरक्षा उपाययोजनाही कडक करण्यात आल्या आहेत. 5 आणि 6 जून या दोन दिवसांसाठी गॅस सिलिंडर, स्टोव्ह आणि चूल यांसारख्या साधनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. महाडचे प्रांताधिकारी ओमासे (Omase) यांनी याबाबत सूचना जारी केल्या आहेत. सोहळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले जात असल्याने गरम तेल सांडणे किंवा गॅस सिलिंडरचा स्फोट होणे यांसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या बंदीमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.
