ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा विजय:अभिजित पवार बाहेर, रवींद्र फाटकांचा बिनविरोध विजय निश्चित; आघाडीला धक्का
![]()
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडीच्या वतीने मैदानात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण निवडणुकीचे चित्रच बदलले आहे. त्यामुळे ठाणे-पालघर मतदारसंघात आता केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे मानले जात आहे. सुरुवातीला या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगणार असल्याची चर्चा होती. महायुतीकडून माजी आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीकडून अभिजित पवार रिंगणात उतरले होते. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि राजकीय वातावरण पाहता ही निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. मात्र, अंतिम टप्प्यात घडलेल्या घडामोडींनी सर्वच समीकरणे बदलून टाकली. अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान अभिजित पवार यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा निर्णय वैयक्तिक कारणांमुळे घेतल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीतील एकमेव विरोधक मैदानाबाहेर गेला आणि रवींद्र फाटक यांच्यासमोर कोणतेही आव्हान उरले नाही. त्यामुळे आता मतदानाची आवश्यकता भासणार नसून रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या जागेवर उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी महायुतीमध्ये काही प्रमाणात रस्सीखेच झाल्याची चर्चा होती. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा केला जात होता. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर ही जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रवींद्र फाटक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे जागावाटपानंतर महायुतीमध्ये कोणतीही उघड बंडखोरी झाली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतही अंतर्गत मतभेद समोर आले नाहीत. तसेच कोणत्याही अपक्ष उमेदवाराने निवडणूक रिंगणात प्रवेश केला नसल्याने स्पर्धा मर्यादित राहिली. रवींद्र फाटक हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचा मजबूत संपर्क आणि संघटनात्मक पकड यामुळे त्यांचे राजकीय वजन मोठे मानले जाते. यापूर्वी 2016 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्यानंतरही त्यांनी ठाणे परिसरातील राजकारणात आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट अभिजित पवार यांच्या माघारीनंतर आता ठाणे-पालघर मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. रवींद्र फाटक हे एकमेव उमेदवार उरल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होणे केवळ वेळेचा प्रश्न मानला जात आहे. या घडामोडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे. आगामी स्थानिक आणि राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हा विजय महायुतीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
