खऱ्या गरजूंना मिळावा सेवा हमी कायद्याचा लाभ:किशोर बोरकर यांचे सेवा हक्क आयुक्तांना साकडे

0
08ad6759-981b-4653-9901-f86c24171faa_1780417058243.jpg




अमरावती येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब निचळ आणि माजी महापौर अशोक डोंगरे यांनी सेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त अरुण डोंगरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खऱ्या गरजूंना सेवा हमी कायद्याचा लाभ मिळावा, अशी मागणी नोंदवली. बोरकर यांच्या म्हणण्यानुसार, जनतेला निर्धारित वेळेत शासकीय आणि निमशासकीय सेवा, दाखले, प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रे मिळावीत यासाठी २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा अस्तित्वात आला. मात्र, या अधिनियमाच्या कलम ३(१)(२) आणि कलम ५(१) मधील तरतुदींचे पालन होत नाही. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये या कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचेही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. या भेटीदरम्यान, बोरकर यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्यानुसार, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा तपशील आणि कालावधी नमूद असलेले फलक त्वरित लावण्यात यावेत. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या धोरणानुसार जे कार्यालय असे करणार नाहीत, तेथील अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना प्राधान्याने सेवा हमी हक्क कायद्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी अमरावती तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख, अमरावती जिल्हा काँग्रेस औद्योगिक विभागाचे अध्यक्ष समीर जवंजाळ, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रा. अनिल देशमुख, राजाभाऊ चौधरी आणि गणेश भोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed