सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागातून 7 हजार कोटी रूपये वळवले:महायुतीचे नव्हे तर महाफसवणुकीचे सरकार – सुनील माने
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतून ८१ लाख महिलांना अपात्र ठरवून वगळण्यात आले असून, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांचे सात हजार कोटी रुपये या योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. हे सरकार ‘महायुतीचे नव्हे, तर महाफसवणुकीचे’ असल्याचा दावा माने यांनी केला. माने म्हणाले की, निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ‘लाडक्या बहिणींना’ पैसे देण्याचे आश्वासन देऊन मते मिळवली. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर ८१ लाख महिलांना अपात्रतेचे निकष लावून योजनेतून वगळले आहे. अनेक महिलांना पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असून, पुढील तारखा दिल्या जात आहेत. या योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांच्या खात्यांमधून ७ हजार कोटी रुपये वळवण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी मागासवर्गीय विद्यार्थी आणि गरिबांच्या कल्याणासाठी वापरला जातो, तर आदिवासी विकास विभागाचा निधी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असतो. यापैकी सुमारे तीन हजार कोटी रुपये वाया गेल्याचे माने यांनी म्हटले. योजनेचे निकष अगोदरच ठरवले जातात, असे असतानाही सरकारने निकष न समजताच पैसे कसे वाटले, असा मूलभूत प्रश्न माने यांनी उपस्थित केला. सरकारच्या माहितीनुसार, १४ हजार पुरुषांनी बनावट माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला आहे. निकषात नसलेल्या ८१ लाख महिलांसाठी वापरलेल्या या कोट्यवधी रुपयांची वसुली सरकार कशी करणार, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणीही माने यांनी केली.
