आठवले कुठेही जाणार नाहीत याचा अर्थ गृहीत धरावे असे नाही:रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा; विधान परिषदेत डावलल्याची खंत
![]()
बकरी ईदच्या कुर्बानीच्या मुद्द्यावरून नुकताच भाजपला घरचा आहेर देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता ट्विटरवर पोस्ट करत महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मला किंवा माझ्या आरपीआय पक्षाला कोणीही गृहीत धरू नये, असे ठणकावून सांगत त्यांनी विधान परिषद निवडणुकीत हक्काची जागा मिळण्यासह आगामी महामंडळ वाटपातही पक्षाला योग्य वाटा मिळण्याची मागणी केली आहे. मित्रपक्षांना दिलेल्या या स्पष्ट इशाऱ्यामुळे महायुतीमध्ये आरपीआयने आपला राजकीय वाटा मिळवण्यासाठी आता बचावात्मक पवित्रा सोडून अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. रामदास आठवले म्हणाले, आपला आरपीआय पक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असल्यामुळे, माझ्याकडून महायुतीत कधीही दगाफटका होणार नाही. ‘आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत’ पण याचा अर्थ आम्हाला कोणीही गृहीत धरावे असा नाही. विधान परिषदेत आम्हाला हक्काची जागा मिळायला हवी होती आणि आता महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या या प्रामाणिक निष्ठेचा व मैत्रीचा योग्य तो सन्मान राखला गेलाच पाहिजे. पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, ज्या काळात भाजप-शिवसेनेसोबत इतर कोणतेही नेते आणि पक्ष येत नव्हते, त्या कठीण काळात आपला आरपीआय पक्ष त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. भाजप-शिवसेनेच्या युतीसोबत जेव्हा आपली आरपीआयची ताकद जोडली गेली, तेव्हाच खऱ्या अर्थाने या युतीची ‘महायुती’ झाली आहे. आज आपण गरीब आणि शोषित घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यशस्वी झालो असून, आपला पक्ष देशभरात वेगाने वाढत आहे. भविष्यात आपल्या पक्षाला कोणीही गृहीत धरू नये आणि सत्तेत आपला हक्क व सन्मान अबाधित राहावा, यासाठी आता आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने व नव्या जोमाने मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
