अवैध व्यवसाय बंद करा; अन्यथा मोर्चा:दहीहंडा विकास मंचाचा इशारा, पोलिस प्रशासनाला पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन
![]()
ऐतिहासिक, सामाजिक आणि क्रांतिकारी वारसा लाभलेल्या दहीहंडा परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी दहीहंडा विकास मंचाने पोलिसांकडे केली आहे. याबाबत मंचाने ठाणेदार गोपाल ढोले यांना निवेदन सादर केले. अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मंचाने दिला आहे. आज खुलेआम वरली मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर अवैध धंदे सुरू असल्याने संपूर्ण गावाची प्रतिमा मलिन होत असल्याचा गंभीर आरोप दहीहंडा विकास मंचाने केला आहे. मंचाच्या निवेदनानुसार, दहीहंडा पोलिस स्टेशन हद्दीतील अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या अवैध धंदे सुरू आहे. युवकांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. अनेक कष्टकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत. व्यसनाधीनता, गुन्हेगारी, घरगुती वाद आणि सामाजिक अस्थिरता दिवसेंदिवस वाढत आहे. असेही मंचाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी निवेदन देताना प्रा. डॉ. विजय आठवले, दीपक भांडे, निलेश जैन, किशोर सिरसाट शोभित आठवले, संजय खाडे, शत्रुघ्न आठवले, गोविंद झाडे, अजय आठवले, आदींची उपस्थिती होती. विकास मंचाच्या मागण्या {दहीहंडा पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व वरली मटका, जुगार अड्डे, अवैध दारू विक्री व इतर सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत. { अवैध धंदे चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी. { अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी. {युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध साम्राज्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. {गावात व्यसनमुक्ती, कायदा सुव्यवस्था, सामाजिक शांतता निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी.
