येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा, अहिल्यानगरमध्ये केले मोठे विधान
![]()
अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. राज्य सरकारने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असून, येत्या 8 ते 10 दिवसांत या कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती भरणे यांनी याप्रसंगी दिली. दत्तात्रय भरणे म्हणाले, सर्वात महत्त्वाची या वर्षीची गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी जाहीर केली आहे. येणाऱ्या आठ-दहा दिवसांत अहिल्यादेवींच्या नावाने जे कर्ज माफी आहे. येणाऱ्या दहा दिवसांमध्ये कर्जमाफी केली जाईल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा वहिनी यांची परवानगी घेऊन मी आपल्या सगळ्यांना सांगतो, असे भरणे म्हणाले. स्त्रियांच्या इतिहासात अहिल्यादेवींचे नाव प्रथम असेल पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात जलसंधारणाचे काम आणि त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. तसेच एका इंग्रजी लेखकाचा संदर्भ देत भरणे म्हणाले, जेव्हा जगातील महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अहिल्यादेवींचे नाव प्रथम स्थानी असेल. तर चोंडी गावाचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी साधारण 1200 ते 1300 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील 2-3 वर्षात या भागाचे चित्र पूर्णपणे बदलेल. तसेच हा आराखडा तयार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मोठे सहकार्य केल्याचे भरणे यांनी यावेळी सांगितले. तसेच धनगर समाजातील तरुण आणि मेंढपाळांसाठी कृषी विभागाच्या वतीने एक नवीन विशेष योजना आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या योजनेवर काम सुरू असून, याचा फायदा समाजातील युवकांना होईल, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
