सरकार माझ्या हत्येची वाट पाहतंय का?:मुख्यमंत्र्यांकडे मागूनही संरक्षण नाही, माझ्यासह कुटुंबाला धोका- विकास लवांडे
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या जीवाला आणि कुटुंबाला धोका असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे वारंवार मागणी करूनही संरक्षण न मिळाल्याने, सरकार आपल्या हत्येची वाट पाहत आहे का, असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला. लवांडे यांनी आपल्या अटकेबाबत माहिती दिली. शरद पवारांच्या विचारांवर भूमिका मांडल्यामुळे वाघोली पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता न्यायालयाच्या आवारातून आपल्याला बेकायदेशीरपणे अटक केली होती, असे ते म्हणाले. मात्र, न्यायालयाने तत्काळ त्यांची सुटका केली आणि जामीन मंजूर करताना पोलीस व सरकारी वकिलांनी आपली चूक मान्य केली. या खोट्या कारवाईविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याचे लवांडे यांनी सांगितले. तरुण मुलांचे ब्रेनवॉश केले जाताय विकास लवांडे म्हणाले की, महाराष्ट्रातील महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारीवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून जाणीवपूर्वक समाजात वाद निर्माण केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आरएसएसप्रणित संघटनांमध्ये तरुण मुलांची भरती करून, त्यांचे ब्रेनवॉश केले जात आहे. मुस्लिम समाज हा शत्रू असल्याचे भासवून समाजात तेढ निर्माण केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. वारकरी संप्रदाय ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न विकास लवांडे म्हणाले की, मूळ वारकरी संप्रदाय ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत लवांडे म्हणाले की, संग्राम भंडारे हा वारकऱ्यांच्या वेशातील गुंड असून त्याच्या पाठीशी कॅबिनेट मंत्री नितेश राणे व भाजप पुरस्कृत लोक आहेत. याच लोकांनी आपल्याला धक्काबुक्की व शिवीगाळ केली. सध्या संभाजी भिडे आणि विश्व हिंदू परिषदेशी निगडित लोकांकडून आपल्याला सातत्याने धमक्या येत आहेत. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास विकास लवांडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना दोन वेळा निवेदन देऊनही अद्याप कोणतेही संरक्षण मिळालेले नाही, असे त्यांनी नमूद केले. मात्र, आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून जीव गेला तरी महापुरुषांच्या आणि सहिष्णुतेच्या विचारांवर ठाम राहून हा लढा शेवटपर्यंत लढणार असल्याचा निर्धार विकास लवांडे यांनी व्यक्त केला.
