अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अचलपूर येथे व्हावे:महानुभाव साहित्याचे अभ्यासक जितेंद्र रोडे यांचे विदर्भ साहित्य संघाला निवेदन
![]()
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अचलपूर शहरात आयोजित करण्यात यावे, अशी मागणी महानुभाव साहित्याचे अभ्यासक जितेंद्र रोडे यांनी केली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या नवनियुक्त संचालिका डॉ. जयश्री कुळकर्णी यांच्यामार्फत हे निवेदन संघाकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनानुसार, अचलपूर नगरीला साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधरस्वामी, ज्येष्ठ साहित्यिक गो. नि. दांडेकर, प्रख्यात लेखक अरुण साधू आणि वक्ता दशसहस्रेषु राम शेवाळकर यांसारख्या अनेक मान्यवरांची ही भूमी आहे. हिंदी आणि उर्दू साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांचेही या शहराशी नाते आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील नाट्यपरंपरेची सुरुवात अचलपूर शहरातूनच झाली आहे. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अचलपूर येथे झाल्यास विदर्भाच्या साहित्यिक वैभवाला नवी ओळख मिळेल, असे मत रोडे यांनी निवेदनात व्यक्त केले आहे.
