पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG दरांचा भडका:रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार? मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येही दरवाढ
![]()
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना आता सीएनजीच्या दरवाढीने सर्वसामान्य वाहनधारकांची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वारंवार वाढल्यानंतर आता सीएनजीचे दरही भडकले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्याने रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या मासिक बजेटवर मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. पुण्यात एमएनजीएल कंपनीने सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपये 50 पैशांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे शहरातील सीएनजीचा दर 92 रुपये 25 पैशांवरून थेट 94 रुपये 75 पैशांवर पोहोचला आहे. वाढीव दर 27 मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले. इनपुट गॅसचा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करावी लागल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे. या वाढीचा थेट परिणाम रिक्षा, टॅक्सी चालकांसह दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. प्रवासखर्च वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शहरातील चिकलठाणा परिसरातील बीपीसीएल पंपावर सीएनजीचे दर किलोमागे 2 रुपयांनी वाढले आहेत. गेल्या 15 दिवसांत येथे सीएनजीच्या किंमतीत 12 रुपयांची वाढ झाल्याने वाहनधारक संतप्त झाले आहेत. शहरात सध्या पेट्रोलचा दर 112 रुपये 88 पैसे प्रति लिटर, तर डिझेलचा दर 99 रुपये 50 पैसे इतका आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीही महाग झाल्याने पर्यायी इंधनाचा फायदा कमी होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात वाढ झाली असून प्रति किलो 1 रुपया 35 पैशांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे शहरात सीएनजीचा नवा दर 96 रुपये 50 पैसे प्रति किलो झाला आहे. यापूर्वी वाहनधारकांना 95 रुपये 15 पैशांमध्ये सीएनजी उपलब्ध होत होते. 28 मेपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. आखाती भागातील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरवाढ याचा परिणाम आता सीएनजीवरही होत असल्याचे बोलले जात आहे. रिक्षा, टॅक्सी आणि कॅब सेवांचे भाडे वाढण्याची शक्यता दरम्यान, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंधनांच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः रिक्षा, टॅक्सी आणि कॅब सेवांचे भाडे वाढण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. सीएनजीचे दर झपाट्याने वाढत असल्यामुळे हे इंधनही लवकरच शंभरी पार करेल, अशी भीती वाहनधारक व्यक्त करत आहेत. सततच्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांकडून सरकारने तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
