अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठीच्या प्रवास प्रबोधनाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन
![]()
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याकरिता सुरू असलेल्या प्रवास प्रबोधनाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशत माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्व सामान्यांना कळेल, अशा सोप्या भाषेत प्रबोधन करणारे जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून, वंचित घटकाला न्याय देण्याचे कार्य केले. अण्णा भाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहून व चित्रपट कथा लिहून देशाला मोठे योगदान दिले आहे. अशा या परिवर्तनवादी महापुरुषाला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामकृष्ण डोंगरे हे गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये व ग्रामीण भागामध्ये गाव गावी जाऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी स्वाक्षरी अभियान राबवून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. दरम्यान माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी सुरू असलेल्या प्रवास प्रबोधनाच्या माहितीपत्रकाचे विमोचन केले करण्यात आले. डॉ. डोंगरे करीत असलेल्या समाज उपयोगी कार्याला आमचे नेहमी सहकार्य राहिल, अशी ग्वाही प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली. प्रवास प्रबोधनाचा उद्देश साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी दीड दिवस शाळेत जाऊन ३५ कादंबऱ्या, १४ लोकनाट्य, १३ कथासंग्रह, १० पवाडे, ४ चित्रपट कथा, आणि १ प्रवास वर्णन असे मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केले. अण्णा भाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची दखल केंद्र व महाराष्ट्र शासनाने घ्यावी, यासाठी प्रवास प्रबोधनाचा सुरू आहे. गत दोन वर्षापासून प्रवास प्रबोधनाचा निरंतर सुरू असून ग्रामीण व शहरी भागात स्वाक्षरी अभियान राबवून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी सातत्याने परिवर्तन युवक संघटना पाठपुरावा करीत असल्याचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण डोंगरे म्हणाले.
