विधान परिषदेसाठी भाजपचा पहिला उमेदवार ठरला:अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी जाहीर, उद्या भरणार अर्ज
![]()
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच अद्याप कायम असतानाच भाजपने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावती मतदारसंघातून भाजपने प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून, ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दुपारी १:४५ वाजता प्रवीण पोटे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इतर घटक पक्षांकडून अजूनही अधिकृत घोषणा झालेली नसताना भाजपने ही आघाडी घेतली आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचे ‘गुऱ्हाळ’ सुरूच विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केला असला, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. भाजप स्वबळावर १४ मतदारसंघांत बहुमतात असल्याने ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) ४ जागांची ऑफर दिली आहे, मात्र शिवसेना ६ जागांवर ठाम आहे. जागावाटपातील कळीचे मुद्दे: १ जूनची डेडलाईन आणि राजकीय समीकरणे विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ जून आहे. सद्यस्थितीतील संख्याबळ पाहता, भाजप १५, शिवसेना १ आणि राष्ट्रवादी १ अशा जागांचे वाटप होण्याची शक्यता आहे, मात्र भाजपने शिवसेनेला सन्मानजनक ४ जागा देऊन युती जपण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांचे नाव निश्चित झाल्याने आता काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात कोण दंड थोपटणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आगामी काळात जागावाटपाचा हा तिढा कसा सुटतो आणि महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसाठी किती तडजोड करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… ठाकुरांच्या 71 मतांवर नजर:ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा भाव वाढला; मतांसाठी भाजप-शिवसेनेची धावपळ राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार हालचाली सुरू असताना ठाणे विधानपरिषद मतदारसंघात वेगळंच राजकारण रंगताना दिसत आहे. ठाण्याची जागा कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये पडद्यामागे मोठी चुरस सुरू असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय समीकरणात वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडी अर्थात बविआच्या 71 मतांना मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळेच आता दोन्ही पक्षांकडून ठाकूर कुटुंबाची मनधरणी सुरू असल्याचं चित्र आहे. सविस्तर वाचा…
