आरटीई प्रवेशासाठी २९ मे अंतिम तारीख:प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
![]()
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २९ मे पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. शिक्षण विभागाने ही अंतिम तारीख निश्चित केली असून, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतले नाहीत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश या मुदतीत पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील २२७ इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत एकूण २ हजार ५८६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी पुणे येथे ऑनलाइन सोडत काढण्यात आली होती. पहिल्या यादीत २ हजार ६२६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती, तर तितकेच विद्यार्थी प्रतीक्षा यादीत होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी १० एप्रिल रोजी प्रसिद्ध करून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सुरुवातीला कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल होती. ही मुदत नंतर वाढवून ३० एप्रिल आणि त्यानंतर ८ मे पर्यंत करण्यात आली. या कालावधीत १ हजार ९१८ प्रवेश निश्चित झाले. शिक्षण विभागाकडील माहितीनुसार, जिल्ह्यात आरटीई अंतर्गत सुमारे ६६८ जागा अद्याप रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी १३ मे पासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जात आहे. ही संधी २९ मे पर्यंत उपलब्ध असेल. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश निश्चित केले नाहीत, त्यांनी या मुदतीत प्रवेश पूर्ण करावेत. यावर्षी आरटीई प्रवेशासाठी एकूण ७ हजार ९६० अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार ६२६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. ८ मे पर्यंतच्या वाढीव मुदतीत १ हजार ९१८ बालकांचे प्रवेश संबंधित शाळांमध्ये निश्चित झाले आहेत. एकूण २ हजार ५८६ जागांपैकी ६६८ जागा रिक्त असल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आता प्रवेशाची संधी मिळाली आहे.
