मुंबईत मान्सूसपूर्व पावसाच्या सरी:उकाड्यामुळे हैरान झालेल्या जनतेला दिलासा, हिंगोली, सोलापुरातही सरी; विदर्भातील उष्णतेची लाट कायम
![]()
गत काही दिवसांपासून वाढत्या तापमानाने मुंबईकरांच्या अंगाची अक्षरशः लाही – लाही होत होती. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मुबलक पाऊसपाणी होणार किंवा नाही? या चिंतेने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. लोक चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. त्यातच आज सकाळी मुंबईतील काही भागांत मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावल्यामुळे उकाड्यामुळे हैरान झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट अजून कायम असून, नागरिकांना अजूनही उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मुंबईत सध्या वाढत्या तापमानाने कहर केला आहे. काल येथील तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. अगोदरच दमट वातावरण आणि त्यात या वाढत्या ताममानामुळे नागरीक अक्षरशः हैरान झाले होते. पण आज सकाळी पावसाने मुंबईतील मुलुंड, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप आदी भागांतहजेरी लावली. सकाळच्या वेळी अचानक झालेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पण काही वेळ बरसलेल्या पावसाच्या या मान्सूनपूर्व सरींमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. हवामान खात्याने पुढील 36 ते 48 तासांत अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उकाडा काहीअंशी कमी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील काही दिवसांत या भागांतही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे 26 मे च्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते टप्प्याटप्याने पुढे सरकत जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रथम मुंबई व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतात. हिंगोली, सोलापुरात काही ठिकाणी पाऊस दुसरीकडे, हिंगोली व सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे या भागांत आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. हिंगोलीच्या वसमत शहरासह तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली, पण शेतीचे काहीअंशी नुकसान झाले. तिकडे सोलापुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर शहरातील काही भागांत पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. सोलापुरात मागील दीड महिन्यांपासून पारा 40 डिग्रीच्या पुढेच आहे. त्यामुळे आजच्या तुरळक पावसामुळे अबालवृद्ध सुखावून गेले. विदर्भातील उष्णतेची लाट कायम दरम्यान, विदर्भातील उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. येथील काही जिल्ह्यांना पुढील 3 दिवस उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणी जनतेला योग्य ती काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे.
