नागेश पाटलांनी 'ऑपरेशन टायगर'ची उडवली खिल्ली:'स्लो ऑपरेशन' असे नाव ठेवण्याचा टोला; उद्धव ठाकरेंशी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा
![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरण यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सत्ताधारी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची त्यांनी अक्षरशः खिल्ली उडवली. लोकांच्या कामांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांन भेटावेच लागते. त्यामुळे या भेटीचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही. मी निवडून आल्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून ऑपरेशन टायगर सुरू आहे. त्यामुळे त्याचे नाव बदलून स्लो ऑपरेशन ठेवा. जे लोक ऑपरेशन टायगर म्हणतात, त्यांनाच हे कधी संपणार ते विचारा, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेच्या अनुषंगाने आपल्या पक्षाच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीला नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. गत काही दिवसांपासून आष्टीकर पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी पक्षाच्या अनेक बैठकांना दांडी मारल्यामुळे यासंबंधीच्या चर्चेला बळही मिळाले. त्यामुळे आजच्या त्यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष होते. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आष्टीकरांनी पत्रकारांच्या सर्वच प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. तसेच एकनाथ शिंदेंची भेट ही लोकांच्या कामासाठीच घेतल्याचेही स्पष्ट केले. आष्टीकर म्हणाले, सध्या आमच्या पक्षाच्या विभागवार बैठका सुरू आहेत. आज आमच्या मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिवा व जालना येथील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षीय संख्याबळ व महाविकास आघाडीशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे संख्याबळ कसे राहील व निवडणूक कशी जिंकता येईल यावरही बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार याचा निर्णय नेते मंडळी घेतील. एकनाथ शिंदेंची कामासाठीच भेट घेतली आष्टीकरांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याचा दावा केला जात आहे. पत्रकारांनी आज त्यांना याविषयी छेडले असता आष्टीकर म्हणाले, मला प्रसारमाध्यमेच चर्चेत आणत आहेत. मी प्रामाणिकपणे सांगतो की, विनाकारण ‘ध’ चा ‘मा’ करू नका. असा कोणताही प्रकार आमच्या कोणत्याही खासदाराच्या मनात नाही. कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांकडे जावेच लागते. त्याच हिशोबाने आमचे जाणे असते. जावेच लागते. पण कोणत्याही बाबतीत अजून किंतू परंतू नाही. पण माध्यमांकडून याविषयी उगीचच गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे असे करू नका अशी माझी विनंती आहे. मी विकासनिधीसाठी शिंदेंची भेट घेतली होती. मी त्याचे पत्रही सादर केले होते. मी एकट्याने जाऊन काहीही होणार नाही. हे सर्वांना माहिती आहे. पण त्यानंतरही उगीचच मला चर्चेत आणता व महाराष्ट्रात सगळीकडे फिरवता. मी त्या दिवशी सह्याद्रीवर अगोदर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मी गेलो तेव्हा ते निघत होते. ते कुठे जात आहेत याची मी माहिती घेतली. त्यावर ते त्यांच्या सरकारी निवासस्थानी गेल्याचे समजले. त्यानुसार मी तिथे जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना पत्र दिले. हा एवढाच विषय आहे. भेटीची उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती का? पत्रकारांनी यावेळी आष्टीकरांना शिंदेंसोबतच्या भेटीची कल्पना तुम्ही उद्धव ठाकरे यांना दिली होती का? असा प्रश्न केला. त्यावर आष्टीकर म्हणाले, पक्षप्रमुख किंवा इतर कुणी मला कधीही सांगितले नाही. दैनंदिन जीवनात लोकांच्या अडीअडचणी असतात. त्यांच्यासाठी जावे लागते. प्रत्येकवेळी जाताना त्यांना सांगणे किंवा विचारणे होत नसते. ज्या – त्या वेळचा प्रश्न असतो. जिथल्या तिथे कामे असतात, ते घेऊन जावे लागते. पण तुम्ही जसे म्हणता, तसे माझ्या पक्षप्रमुखांनी मला कधीच विचारले नाही. त्यावर आक्षेपही घेतला नाही. दिल्लीतील स्नेहभोजनावर काय म्हणाले? पत्रकारांनी यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या स्नेहभोजनाला आष्टीकरांनी लावलेल्या हजेरीविषयीही प्रश्न केला. त्यालाही त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, असे वारंवार कधीच घडले नाही. ज्या खासदारांना तिथे असताना वेळ असेल किंवा बोलावले असेल तर तिथे जाण्यात काहीही गैर नाही. एखादावेळी जेवायला गेले किंवा भेटायला गेले तर तेच बोलणे होईल असे कुठे असते का? दिल्लीसारख्या ठिकाणी महाराष्ट्राचा माणूस कुणी कुणाला भेटत नाही किंवा कुणाची भेट होत नाही. एवढा मोठा दिवस असतो. एक मिटिंग संपली की, पुन्हा काही का नसते. त्यामुळे एवढा मोठा दिवस आपल्या माणसासोबत घालायचा असेल किंवा कुणीतरी बोलवत असेल तर त्यात काहीही गैर नाही. मी सुद्धा जेवण दिले होते. त्यालाही अनेक पक्षांचे खासदार आले होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला एक माणुसकीच्या नात्याने पाहिले पाहिजे. एकच गोष्ट नसते. ऑपरेशन टायगरला स्लो ऑपरेशन नाव ठेवा नागेश पाटलांनी यावेळी कथित ऑपरेशन टायगरची खिल्लीही उडवली. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंना 7 खासदार भेटले किंवा त्याहून अधिक भेटले. मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे लोकांची कामे घेऊनी जावेच लागेल. सर्वांनाच भेटावे लागेल. पण त्याचा अर्थ असाच काढायचा हे चुकीचे आहे. ऑपरेशन टायगर असे यासंबंधी म्हटले जाते. पण टायगर हा आपल्या देशाचा एक मोठा अभिमानाचा प्राणी आहे. त्याला एवढे मोठे नाव देऊन तुम्ही मागील 2 वर्षांपासून ऑपरेशन टायगर म्हणता. जे लोक ऑपरेशन टायगर म्हणतात, त्यांनाच विचारा की हे कधी संपणार आहे. आम्ही निवडून आल्यापासून दुसऱ्यापासून ऑपरेशन टायगर सुरू आहे. आता हे बंद करा. त्याचे नाव बदलून स्लो ऑपरेशन असे ठेवा. सत्ताधारी पक्षात केव्हा जाणार? पत्रकारांनी यावेळी तुम्ही सत्ताधारी पक्षात केव्हा जाणार? असा थेट प्रश्न केला. त्यावर आष्टीकर म्हणाले, तुम्ही मला कधी जाणार हा प्रश्न केला. जाण्याचा विषय आमच्या मनातही नाही. पण तुम्ही जुलमेच पाठवत असाल तर ज्या दिवशी जायचे असेल त्या दिवशी तुम्हाला बोलवून घेतो व सांगतो. पण आज उद्धव ठाकरेंशी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी शिंदेंसोबतच्या भेटीविषयी एकही शब्द आम्हाला विचारला नाही. या प्रकरणी काही सांगण्यासारखे असते तर मी नक्कीच उद्धव यांना सांगितले असते. मी त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवली नाही. आजही तुम्ही चर्चा करता म्हणून चर्चा होत आहे. पण आमच्या बैठकीत यावर एक शब्दही कुणी विचारला नाही.
