अमरावतीत राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन:राजीव गांधींनी देशात संगणक, दूरसंचार क्रांती घडवली – काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देशमुख
![]()
माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती येथे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी राजीव गांधी हे देशातील तंत्रज्ञान क्रांतीचे खरे जनक असल्याचे प्रतिपादन केले. देशमुख म्हणाले की, राजीव गांधींनी देशात संगणक, दूरसंचार आणि टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगतीची नवी दिशा मिळवली. संगणक आणि दूरसंचार क्षेत्रातील धोरणांमुळे देशातील लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, असे त्यांनी नमूद केले. काँग्रेस भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमात माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्यासह इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीव गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. बबलू देशमुख यांनी पुढे सांगितले की, १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ऐतिहासिक यश मिळाले होते. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी देशाचे सातवे पंतप्रधान म्हणून राजीव गांधींनी जबाबदारी स्वीकारली आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या विचारांमधून काँग्रेस कार्यकर्त्यांना आजही प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले. यावेळी हरिभाऊ मोहोड, जयंतराव देशमुख, संजय वानखडे, प्रकाश काळबांडे, रामेश्वर अभ्यंकर, सतीश हाडोळे, कांचनमाला गावंडे, भागवत खांडे, प्रवीण मनोहर, मुकद्दर खान पठाण, भैय्यासाहेब मेटकर, सुनील जुनघरे, समाधान दहातोंडे, संजय बेलोकर, नंदू यादव, अनिकेत ढेंगळे, रितेश पांडव यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
