विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र, अद्याप तोडगा नाही:पुढच्या टप्प्यात धरणे, मोर्चा; आज द्वारसभा झाली
![]()
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी १४ मे पासून श्रृंखलाबद्ध आंदोलन सुरू केले आहे. शासनाने अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघाने येत्या काळात लढा अधिक तीव्र करण्याची तयारी केली आहे. याच क्रमात आज, सोमवारी द्वारसभा घेण्यात आली. शासनाकडून मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आज दुपारच्या सुटीत विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर निषेध सभा (द्वारसभा) आयोजित करण्यात आली होती. या सभेला विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांवर शासनाकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली गेलेली नाही. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येत शासनाच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. यावेळी “कर्मचारी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण विद्यापीठ परिसर दणाणून सोडला. कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख आणि महासचिव नरेंद्र घाटोळ यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे. पुढच्या टप्प्यात धरणे आंदोलन आणि मोर्चाही काढला जाणार आहे. या आंदोलनाच्या निषेध सभेला अधिकारी फोरमचे डॉ. दादाराव चव्हाण आणि मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष मंगेश वरखेडे यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या या लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला. याशिवाय नागपूर विद्यापीठ टीचर्स असोसिएशननेही या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे.
