अल्पभूधारक शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या:कर्जामुळे उचलले टोकाचे पाऊल, हिंगोलीच्या जयपूरवाडीमधील घटना

0
orignew-project-751654823162_1779001924.jpg




हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी येथील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी ता. 17 उघडकीस आली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी येथील शेतकरी मारोती नामदेव फाळके (44) यांना साडेतीन एकर शेत आहे. घरी आई, पत्नी, मुलगा असा परिवार असून या शेतावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या शेतीवर त्यांनी बँकेचे कर्ज घेतले होते. मात्र मागील दोन ते तीन वर्षापासून सतत होणाऱ्या नापीकीमुळे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. दरम्यान, मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे सर्व आशा रब्बी हंगामावरच होत्या. मात्र रब्बी हंगामातही अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. दोन्ही हंगामात नुकसानच झाल्याने आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा तसेच कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. दरम्यान, शनिवारी ता. 16 रात्री फाळके कुटुंबिय जेवण करून झोपी गेले होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मारोती झोपेतून जागे झाले अन त्यानंतर ते थेट शेतात गेले. त्या ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र घराबाहेर गेलेले मारोती फाळके बराच वेळ होऊनही घरात कसे आले नाही यामुळे त्यांचा मुलगा व भाऊ यांनी परिसरात पाहणी केली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. मात्र शेतात गेल्यानंतर मारोती यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार बापुराव चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत मारोती यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed