![]()
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि बंडखोरीच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटाचेही खासदार फुटणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत या सर्व चर्चांवर पहिल्यांदाच अत्यंत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा एकसुद्धा आमदार कुठे जाणार नाही,” असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. विद्या प्रतिष्ठानच्या वाटेवर दिली प्रतिक्रिया शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून, ते ‘विद्या प्रतिष्ठान’ संकुलात आयोजित एका बैठकीसाठी जात होते. यावेळी त्यांच्या वाहनात त्यांच्यासोबत युगेंद्र पवार हेदेखील उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानकडे जात असताना वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठले आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारला. “ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातील आमदार आणि खासदारही फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे, यावर तुमचे काय म्हणणे आहे?” असा थेट प्रश्न विचारण्यात आला. यावर क्षणाचाही विलंब न लावता शरद पवारांनी, “आमचा एकसुद्धा आमदार कुठे जाणार नाही,” असे सांगत पक्षातील फुटीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. धर्मरावबाबा आत्रामांचा दावा काय होता? शरद पवारांच्या या प्रतिक्रियेला मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या एका विधानाची किनार आहे. नुकतेच धर्मरावबाबा आत्राम यांनी एक मोठे वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. “येत्या 12 डिसेंबरपूर्वी शरद पवार गटाचे तब्बल 5 खासदार फुटतील आणि ते आमच्याकडे (महायुतीत) येतील,” असा दावा आत्राम यांनी केला होता. आत्रामांच्या या दाव्यानंतर आणि ठाकरे गटाच्या खासदारांच्या बंडखोरीनंतर शरद पवार गटही ‘अलर्ट मोड’वर आल्याचे बोलले जात होते. मात्र, पवारांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. ठाकरे गटाच्या 6 खासदारांची बंडखोरी आणि ‘ऑपरेशन टायगर’ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नुकतेच ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात आले. या अंतर्गत ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला. एवढेच नव्हे तर, या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटासाठी पत्रही दिले आहे. खासदारांच्या या बंडखोरीनंतर आता ठाकरे गटाचे काही आमदारही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीला ठाकरे गटाकडून ‘असे कोणतेही ऑपरेशन आमच्या पक्षात फूट पाडणार नाही’ असा दावा केला जात होता. मात्र, प्रत्यक्ष खासदार फुटल्यानंतर ‘मातोश्री’वर तातडीने खासदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष पोहोचले, तर काहींनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली होती. महाविकास आघाडी ‘अलर्ट मोड’वर शिवसेना ठाकरे गटात पडलेल्या या मोठ्या फुटीनंतर राज्यातील राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष सावध झाले असून, ते ‘अलर्ट मोड’वर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसनेही आपल्या लोकप्रतिनिधींशी संवाद वाढवला असून, आगामी काळात राज्यात आणखी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. संबंधित बातमी वाचा… महाविकास आघाडीच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी:पावसाळी अधिवेशनादरम्यान एकजुटीवर प्रश्नचिन्ह; नेत्यांनी दिली स्पष्टीकरणे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून सरकारच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) बोलावलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश असल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या गैरहजेरीची दखल घेत ‘आपल्यात खरोखर एकी आहे का?’ अशी चिंता व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
आमचा एकही आमदार कुठेही जाणार नाही!:ठाकरेंच्या 6 खासदारांची फूट आणि आत्रामांच्या दाव्यानंतर शरद पवारांचे बंडखोरीच्या चर्चेवर स्पष्टीकरण
